मुंबई : राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून आता काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे घाटातल्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाची सुरुवात पावसाने झालीच आता सांगताही पावसानेच होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई आयएमडीकडून करण्यात आले आहे. यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ९९.२७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.