नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे ५१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत.
पंतप्रधानांनी नियुक्ती पत्रे मिळालेल्यांचे अभिनंदन केले. हे सर्व जण त्यांचे अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर येथपर्यंत पोहोचले असून लाखो उमेदवारांमधून ते निवडले गेले आहेत, देशभरात सध्या गणेशोत्सव साजरा केला जात असताना या नवनियुक्तांच्या नवीन आयुष्याचा श्री गणेशा अशा मंगल समयी होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. श्री गणेश हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिदाता असून नवनियुक्त उमेदवारांची सेवेप्रती असलेली निष्ठा देशाला आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
देश अनेक ऐतिहासिक कामगिरींचा साक्षीदार होत आहे असे सांगून पंतप्रधानांनी देशातील निम्म्या लोकसंख्येला सक्षम करणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाचा उल्लेख केला. गेल्या 30 वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विक्रमी मताधिक्याने संमत झाले. नवीन संसद भवनाच्या पहिल्याच सत्रात या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले म्हणजे एका अर्थी नवीन संसद भवनात संमत झालेले नारी शक्ती विधेयक हा देशासाठी एक नवीन प्रारंभ ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.
नवनियुक्तांमध्ये महिला उमेदवारांच्या उल्लेखनीय उपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहेत, नारीशक्तीच्या यशाचा मला अपार अभिमान वाटतो आणि सरकारच्या योजना त्यांच्या विकासासाठी नवनवीन दालने खुली करत आहेत, कोणत्याही क्षेत्रात महिलांचा असलेला सहभाग हा त्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणतो असे पंतप्रधान म्हणाले.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!