'राहुल गांधी मोठे नेते, ते घुसखोरीबद्दल जे बोलत आहेत ते खरं' - संजय राऊत
20-Aug-2023
Total Views | 60
मुंबई : लडाखच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (२० ऑगस्ट) लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा केला. राहुल गांधींच्या विधानाला उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी देशातील प्रमुख नेते, ते चीनच्या घुसखोरीबद्दल जे बोलत आहेत ते खरं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दावा केला आहे की, 'चीनने लडाखमध्ये घुसखोरी करून कब्जा केला आहे. याचे पुरावेही समोर आले आहेत, पण आपले संरक्षणमंत्री, आपले पंतप्रधान हे मान्य करायला तयार नाहीत, त्यामुळे आपण भारतमातेवर अन्याय करत आहोत, असे दिसते.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी देशाचे प्रमुख नेते आहेत, ते खासदार आहेत, ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. जर त्यांनी एखादी गोष्ट मांडली तर ते काळजीपूर्वक मांडतात. चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचे राहुल गांधींनी म्हटले असेल, तर जनतेची दिशाभूल करण्याची गरज नाही, मग ते पंतप्रधान असो किंवा संरक्षण मंत्री, जनतेला सत्य सांगा.