स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे इर्शाळवाडीत!
15-Aug-2023
Total Views | 71
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांना भेट दिली. इर्शाळवाडीमधील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसण कंटेनरमध्ये करण्यात आले होते. या कंटेनर्समध्ये त्यांना पायाभूत सुविधा मिळत आहेत की नाही याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. सरकारने मदतीचा हात पुढे करत इथल्या रहिवाशांसाठी खालपूर चौक या भागात एक सुंदर गाव उभं केलं आहे. सरकारकडून इर्शाळवाडी ग्रामस्थांना अन्न वस्त्र आणि निवारा या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.
सरकारकडून पुरवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 200 जणांचं जेवण, वैद्यकीय सुविधा, लहान मुलांसाठी नर्सरी, खेळण्यासाठी मैदान, 24 तास गरम आणि थंड पाणी, शौचालय, घनकचरा व्यवस्थापन,अशा पद्धतीची सुविधा या ठिकाणी रहिवाशांसाठी करण्यात आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.
शिक्षण घेणाऱ्या मुलांची त्याच ठिकाणी सोय करण्यात येणार असून जे मुलं या घटनेत अनाथ झाले, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्वासन देण्यात आले. "रोजगाराचा विषय कशा माध्यमातून आपल्याला मार्गी लावता येईल, तशा तातडीने सुचना दिल्या आहे. काही लोकांना नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, व्यवसायासाठी जागा आणि आर्थिक मदत याठिकाणी करु. एका व्यवसायातील किती लोक सामावले जाऊ शकतात, याचा आढावा घेऊन लवकर निर्णय घेऊ." असंही शिंदे म्हणालेत.