नवी दिल्ली : पार्थ कपोले मणिपूरमध्ये चालू असलेला जातीय हिंसाचार हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याने संपूर्ण देशाने याबाबतीत सकारात्मक पाऊले उचलण्याचे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने केले आहे.
कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामचंद्र खराडी यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, मणिपूरमध्ये गेल्या ३ मे पासून चालू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना ह्या केवळ कुकी - मैतेयी यांच्या दृष्टीनेच नाही तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले असून हजारो नागरिक आपल्याच राज्यात शरणार्थीचे जीवन जगत आहेत. जे समुदाय हजारो वर्षापासून एकत्र राहत होते त्यांच्यातील विश्वासाला या घटनांमुळे तडा गेला असल्याचे कल्याण आश्रमाने म्हटले आहे.
आपल्या देशाचे सीमावर्ती क्षेत्र जेव्हा अशा घटनांचे केंद्र बनते तेव्हा देशी - विदेशी स्वार्थी शक्ती आगीत तेल ओतण्याचे कार्य करतात. ही बाब लक्षात घेऊन समाजातील प्रबुद्ध नागरिकांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देश हितासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. कारण राज्यातील नागरिकांमध्ये विश्वास पुन्हा निर्माण करणे हे सध्या खरे आव्हान असून त्याची सुरुवात शांती प्रस्थापित करण्यातूनच होईल असे कल्याण आश्रमाचे मत आहे.
राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मणिपूर मधील जनतेने लवकरात लवकर बाहेर पडण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करतानाच देशातील प्रतिष्ठित व्यक्ती, अध्यात्मिक, राजकीय, क्रीडा, पूर्व सैन्याधिकारी, राजकीय, चित्रपट, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राज्यातील पीडित नागरिकांना दिलासा देण्यासाठी शांतता यात्रांचे आयोजन करण्याचे आवाहन कल्याण आश्रमाने केले आहे. समाजातील अशा विविध घटकांमार्फत होणारे हे प्रयत्न सकारात्मक दृष्ट्या प्रभावी ठरतील. त्यामुळे अधिक वेळ न दवडता लवकरात लवकर त्या दिशेने सकारात्मक पावले टाकण्याचे आवाहन देखील कल्याण आश्रमाने निवेदनात केले आहे.