जितेंद्र आव्हाड पुन्हा बरळले; सिंधी समाजाला कुत्रा संबोधले
सिंधी समाज आक्रमक ; आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी
31-May-2023
Total Views | 1195
ठाणे : माजी गृहनिर्माण मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात सिंधी समाजाला 'कुत्रा' संबोधल्याने सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी ठाण्याच्या कोपरी भागात सिंधी समाजाने मेळावा घेऊन आक्रमक होत आ. आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सभा २७ मे रोजी उल्हासनगर प्रभात गार्डन, कॅम्प-5 जवळ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलतांना आ.जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली. आव्हाड यांनी सिंधी समाजाला चक्क कुत्र्यांची उपमा दिली. त्यामुळे सिंधी समाज आक्रमक झाला असुन या विरोधात बुधवारी कोपरीतील सिंधी समाजाने एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाण्याच्या कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी बांधव वास्तव्याला आहेत. येथील सिंधी बांधवांनी कोपरीतील शंकर मंदिरात एकत्र येत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. तसेच जोपर्यंत जितेंद्र आव्हाड हे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे प्रकाश कोटवानी, गोपाळ लांडगे, हेमंत पमनानी,दिपक घनशानी यांच्यासह कोपरीतील सिंधी समाज तसेच इतर समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर गोपाळ लांडगे आणि सिंधी समाजातील कोटवानी व घनशानी यांनी बरळणाऱ्या आ. आव्हांडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
काय बरळले आव्हाड
उल्हासनगर येथील सभेत आ. आव्हाडांची जीभ घसरली. यावेळी बोलताना आव्हाडांनी, हाथी चले बाजार ... कुत्ते भौके हजार... और एक शेर को मारने के सौ सिंधी कुत्ते दौड रहे है । अशी आक्षेपार्ह भाष्य केले.दरम्यान,या वक्तव्यानंतर आव्हाडांनी प्रतिक्रिया देताना माफी तर दूरच उलट सिंधी समाजातील त्या एका व्यक्ती विरोधात हे वक्तव्य केल्याची शेखी मिरवल्याने संतापाची लाट उसळली आहे.