ठाणे : ठाण्यातील मनोरमानगर मधील एनेमिया शिबिरात ४४ टक्के महिला एनेमियाग्रस्त असल्याचे निदान झाले तर मानपाडा येथे १३ मे रोजी आयोजित केलेल्या शिबिरात ही संख्या तब्बल ५५ टक्के असल्याचे समोर आले आहे. "एनेमीयामुक्त भारत " अभियान अंतर्गत भारत विकास परिषदेने मुंबई व कोंकण विभागात एकूण २३ शिबिरांचे आयोजन केले होते. यात घोडबंदर शाखेने तीन शिबिरांचे ठाण्यात आयोजन केले होते. मनोरमानगर येथील शिबिरात १७०० महिलांचे रक्त तपासण्यात आले.१३ मे रोजी पार पडलेल्या मानपाडा येथील शिबिरात सुमारे ५२५ महिलांचे रक्त तपासण्यात येऊन मोफत औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर चणे व गूळ वाटप करण्यात आले.
भारत विकास परिषद दर दोन महिन्यांनी अशी शिबिरे भरवून दिलेल्या औषध उपचारांचा आढावा घेत अनेमीयाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करील, असे घोडबंदर रोड शाखेचे अध्यक्ष सुरीन उसगावकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस महाग होत जाणाऱ्या ताज्या पालेभाज्या व स्वयंपाकाचे आधूनिकरण हे या आजाराचे मुख्य कारण आहे. महाराष्ट्र सरकारने व विशेषतः महापालिकेच्या आरोग्य विभागाने यात तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. असे मत शिबिरांचे नेतृत्व करणाऱ्या परिषदेच्या घोडबंदर रोडचे सेवा विभाग प्रमुख दत्ता घाडगे यांनी व्यक्त केले.