नागपूर : गुन्हेगारीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चुकीचे चित्र विरोधकांनी रंगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे सर्वात सुरक्षित राज्य असल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजी विधानसभेत व्यक्त केले. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, दिल्ली आणि मुंबईची तुलना केली, तर मुंबईमध्ये मुली १२ वाजताही सुरक्षित फिरू शकतात. तरीही आकडेवारून महाराष्ट्राला बदनाम केले जाते. प्रतिलाख लोकसंख्येच्या तुलनेत खुनामध्ये महाऱाष्ट्र २० व्या स्थानावर आहे.
महिलांवरील हल्ल्यातही महाराष्ट्र देशात १६ व्या स्थानावर आहे. एकाही महिला भगिनीवर अत्याचार झाला, तरी तो भूषणावह नाही. परंतु, यावरून असे चित्र रंगवले जाते की, आपले राज्य गुन्हेगारीत पुढे गेले; ते वस्तुस्थितीला धरून नाही. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी आमच्या सरकारने २७ विशेष न्यायालये, ८६ जलद गती न्यायालये स्थापन केली आहेत. माझा आकडेवारीला विरोध आहे. आकडेवारून विश्लेषण करण चुकीचे आहे. लोकांना सुरक्षित कशात वाटते, यावर माझा भर आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
२०२० मध्ये ४ हजार ५१७ मुली, ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. २०२१ मध्ये ४ हजार मुली आणि ६०महिला बेपत्ता झाल्या होत्या. मात्र डिटेक्शनचे (अन्वेषण) प्रमाण ९०टक्क्यांवर आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची स्थिती खूप बरी आहे. २०२० मध्ये ३ लाख ९४ हजार इतके गुन्हे नोंद झाले. तर,२०२२-२३ मध्ये २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल आहेत. २०२० च्या तुलनेत हे गुन्हे कमी झाले आहेत. महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्येही नाही. अपहरणामध्ये महाराष्ट्र बिहारपेक्षाही पुढे गेल्याचा आरोप झाला. परंतु, ते खरे नाही. महाराष्ट्र ९.८ वर आहे. इतर राज्याच्या तुलनेत हे आकडे खूपच कमी आहेत. दंगली वाढल्या, असेही विरोधक म्हणाले, मात्र त्यांनी जी आकडेवारी वाचली, ती दंगलीचे नव्हे. आपल्याकडे चार जणांमध्ये भांडण झाले तरी ते कलम लागते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांच्यावर काँग्रेसमध्ये अन्याय
ज्यांनी प्रस्ताव मांडला ते नाना पटोले सभागृहात नाहीत. मला अपेक्षा होती की, किमान अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विदर्भाचा विषय घेतला जाईल. मात्र, विरोधी पक्षनेते विदर्भाचे असतानाही विदर्भासंदर्भात चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना विदर्भावर बोला, अशी टाकी केली होती. पण, प्रत्यक्षात सभागृहात त्यांच्या एकाही आमदाराने विदर्भातील प्रश्नांवर भाष्य केले नाही. खरेतर विरोधी पक्षनेत्याने हा प्रस्ताव मांडणे अपेक्षित असते. परंतु, नाना पटोले यांनी त्यांना तो मांडू दिला नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्यावर त्यांच्याच पक्षात अन्याय होत असल्याचे दिसते, असा टोमणा फडणवीस यांनी लगावला.
ड्रग्ज विरोधात सर्वात मोठी कारवाई
आमच्या सरकारच्या काळात ड्रग्जविरोधात पहिल्यांदाच मोठी कारवाई झाली. २४ हजारांहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या. २०२० मध्ये ५ हजार ३२१ आरोपींवर कारवाई होती. गेल्या काही दिवसांत १३ हजार १२५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. पोलीस दलाला नवे स्वरूप देत २०११ च्या जनगणनेनुसार सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन पोलीस ठाण्यांमधील अंतर आणि सर्व नियम बदलले जातील. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांत सध्या मोठी वाढ होत आहे. ही बदलती परिस्थिती लक्षात घेता नवीन आकृती बंद तयार केला आहे. एनसीआरबीचा अहवाल बघता, जयंत पाटील आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते तरी त्यांनी अहवालाचे नीट वाचन केले नाही. एनसीआरबीचा अहवाल कसा वाचावा हे मी त्यांना शिकवतो, असा टेलाही त्यांनी लगावला.
पोलिसांना ८ तासच काम
पोलिसांना ८ तासांची नोकरी देऊन त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५५ वर्षांवरील पोलीस अंमलदारांना १६ तास आराम करण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांना आरोग्याच्या सुविधाही पुरविल्या जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.