ठाणे : ठाण्यातील विकासक सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? अभियंता अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात ? अंगरक्षक वैभव कदमच्या आत्महत्येस जबाबदार कोण ?...डॉ. जितेंद्र आव्हाड या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी जाहिर पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांना दिले.
सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे तत्कालीन ठामपा विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली. तेव्हा जितेंद्र आव्हाड, आपण स्वतःला वाचविण्यासाठी कोणाकोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेला होतात ? हे एकदा जाहीर करा. अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण प्रकरणी, मी आपणांस ५ ऑगस्ट २०२० साली रात्री ८ वाजता आपल्या घरी येऊन विनंती केली होती की, असे करु नका तरी, आपल्या खूशमस्कऱ्यांचे ऐकून कॅबिनेट मंत्री असतानाही आपण पोलीसांसमोरच अनंत करमुसे यांना बेदम मारहाण करुन बालिशपणा दाखविलात आणि पोलिसांचे करिअर बर्बाद केलेत, याचे उत्तर द्या ! वैभव कदम या आपल्या अंगरक्षकाच्या आत्महत्येस व त्यांच्या कुटुंबाचा आधार नष्ट करणाऱ्या गोष्टीस जबाबदार कोण ? या तीन प्रश्नांची उत्तरे द्या. ना. अजितदादा व ना. धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट व बेलगाम आरोप करण्याअगोदर आपणही काचेच्या घरात रहातोय, आपण एक दगड माराल तर आम्ही दोन दगड मारु शकतो हे लक्षात ठेवा, असा इशाराही आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाचे बिंग फुटले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समारोपाच्या भाषणात बोलताना २००४, २०१७, २०२९, २२ जून २०२२, तसेच २ जुलै, १२ जुलै, १२ ऑगस्टपर्यतच्या पक्षांतर्गत घटनांची दिलेली सविस्तर माहिती खरी असल्याचे आनंद परांजपे यांनी उघड केले. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राजीनामा मागे घ्यावा म्हणून सर्वप्रथम माझ्या नेतृत्वाखाली ठाण्यात व बॅलॉर्ड इस्टेट व यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आंदोलन करण्यात आले होते. अजितदादा नेहमीच खरे बोलतात यामुळे अजितदादांनी जे सांगितले आहे ते सर्वस्वी खरेच आहे, हे गुपीतही आनंद परांजपे यांनी फोडल्याने आव्हाडांच्या कुटनितीचा पर्दाफाश झाला आहे.