मुंबई : मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाने तसंच समता परिषदेने कधीही विरोध केलेला नाही. पण आम्ही पहिल्यापासून हे निश्चितपणे म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. वेगळं आरक्षण त्यांना द्या, सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी असतील त्या दूर करा आणि मराठा बांधवाना आरक्षण द्या. असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, "मी बीड आणि माजलगाव ला गेलो होतो. मी किंवा माझ्या पक्षाने आरक्षणाला विरोध केला नाही. आम्ही हे म्हणतो आहे की,आमच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या. ओबीसीमध्ये छोट्या जाती आहेत, त्यात मराठ्यांना काही मिळणार नाही. जी आमची भूमिका तीच शिंदे, शरद पवार, फडणवीस यांची आहे.हे आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस केली. सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्यानंतर त्यावेळी मी सांगितले होते की, हॉटेलला संरक्षण द्या. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी कोयते,पेट्रोल बॉम्ब सोबत होते. ओबीसी असल्याने असे हल्ले केले जात आहे."
"जयदत्त क्षीरसागर यांचं ऑफिस बेचिराख करण्यात आलं. संदीप क्षीरसागर यांच्या घरीही हाच प्रकार घडला. तिथल्या मुलांना भिंतीवरुन उड्या टाकून बाहेर पडावं लागलं. आगीत ती मुलं सापडली असती तर ती मुलं मेली असती. नासधूस करण्यासाठी सांकेतिक क्रमांक दिले गेले होते. जी काही जाळपोळ झाली ती पूर्वनियोजित कट रचून झाली. तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसात कसे मिळाले. 13 हजार पुरावे मिळाले म्हणता? सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको." अस भुजबळ म्हणाले.