महाराष्ट्र : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी काल ३ नोव्हेंबर रोजी केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, " बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ महाराष्ट्रातील महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्ज, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध्ये आजची तरुणपिढी गुरफटत चालली आहे व हेच कारण कर्करोगाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असून यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे भारताच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहणे हि आजच्या काळाची गरज आहे, यामध्ये शिक्षक, पालक तसेच सामाजिक संस्थानी पुढाकार घेणे महत्वाचे आहे."
या वैद्यकीय परिषदेविषयी अधिक माहिती देताना इंडियन कॅन्सर काँग्रेसचे चेयरमन डॉ. संजय शर्मा म्हणाले," कॅन्सरचे निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या देशभरामध्ये वाढत असून या आजारावरील उपचारांमध्ये अनेक आधुनिक बदल झाले आहेत. इंडियन कॅन्सर काँग्रेस हि एक वैद्यकीय परिषद असून भारतातील चार सर्वात ऑन्कोलॉजी सोसायटींच्या मदतीने एकत्रितपणे राबविली जाते ज्यामध्ये भारतातील सर्जिकल, रेडिएशन आणि वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट, तसेच ऑन्को-पॅथॉलॉजिस्ट, ऑन्को-रेडिओलॉजिस्ट विभागातील भारतातील प्रमुख तज्ञ सहभाग घेतात.
इंडियन असोसिएशन ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी (IASO), इंडियन सोसायटी ऑफ ऑन्कोलॉजी (ISO), इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी (ISMPO), आणि द असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ऑफ इंडिया (AROI). चार संस्थांद्वारे दर चार वर्षांनी इंडियन कॅन्सर काँग्रेस चे आयोजन केले जाते इंडियन कॅन्सर काँग्रेसची पहिली परिषद दिल्ली २०१३ मध्ये तर दुसरी बंगलोर (२०१७) व तिसरी मुंबईतील २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान भरविली जाणार आहे. कोव्हीड महामारीमुळे तिसऱ्या परिषदेला २ वर्षे विलंब झाला. या परिषदेत दोन हजाराहून अधिक तज्ञांनी यात सहभाग घेतला असून कर्करोगावरील औषधे तसेच वैद्यकीय तंत्रज्ञान बनविणाऱ्या भारतातील व विदेशातील १०० हुन अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.".