राहूल गांधी 'राष्ट्रीय पप्पू'! केसीआर यांच्या मुलाचा घणाघात
04-Nov-2023
Total Views | 149
मुंबई : विधानसभा निवडणूका जवळ आल्या असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिपण्णी होत आहे. यातच आता बीआरएस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राहूल गांधींना 'राष्ट्रीय पप्पू' म्हटले आहे.
नुकतेच राहुल गांधींनी ट्विट करत केटीआर यांना धारेवर धरले होते. कालेश्वरम प्रकल्प केसीआर आणि त्यांच्या कुटुंबासाठी 'एटीएम' असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच हा प्रकल्प म्हणजे १ लाख कोटींचा घोटाळा असून केसीआर जनतेचा पैसा लुटत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले होते.
यावर उत्तर देताना मंत्री केटीआर म्हणाले की, राहुल गांधींना गोष्टी समजत नाहीत. ते करत असलेले आरोप चुकीचे आहेत. राहुल गांधी जल प्रकल्पाशी संबंधित खांब बुडण्याला भ्रष्टाचार म्हणत आहेत. खरंतर हा विस्ताराचा भाग असून तिथे काम सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना केटीआर म्हणाले की, “कालेश्वरम प्रकल्प तेलंगणातील लोकांसाठी वरदान आहे, तर काँग्रेस तेलंगणासाठी शाप आहे. राहुल गांधींना ना तेलंगणाचा इतिहास माहीत आहे ना, त्यांनी राज्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता त्यांनी लेखक बदलण्याची आणि त्यांच्या पक्षाचे नेते त्यांना जे काही सांगतात ते ऐकणे बंद करण्याची वेळ आली आहे, असेही केटीआर म्हणाले.
तसेच त्यांनी राहुल गांधींना 'पप्पू ऑफ इंडिया' आणि तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांना 'पप्पू ऑफ तेलंगणा' असे म्हटले आहे. केटीआर म्हणाले की, हे लोक इंजिनिअर सारखे बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतू, त्यांना ते काय बोलत आहेत हेदेखील माहित नाही
काँग्रेस पक्षाचे नाव काँग्रेस नसून 'घोटाळा' असावे. काँग्रेसच्या कर्नाटक मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गावातही पाणीपुरवठा होत नाही. हे कोणत्या प्रकारचे मॉडेल आहे? असेही केटीआर म्हणाले आहेत.