नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारला धक्का दिला असून रायथू बंधू योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य करण्याची परवानगी मागे घेतली आहे. रायथू बंधू योजनेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारला मोठा दणका दिला आहे. या योजनेंतर्गत आर्थिक मदत वाटप करण्यासाठी तेलंगणा सरकारला दिलेली परवानगी निवडणूक आयोगाने मागे घेतली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या एका मंत्र्याने या योजनेविषयी सार्वजनिक विधान केल्यानंतर निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करत नवीन निर्देश जारी केले आहेत.
तेलंगणा सरकारचे वित्त आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री टी. हरीश राव यांनी २६ नोव्हेंबर रोजी रायथू बंधू योजनेच्या वितरणाबाबत मतदानपूर्व विधाने केली आहेत. राव स्वतः बीआरएस पक्षाकडून सिद्धीपेट विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत. राव यांनी या योजनेविषयी विधाने करून आदर्श आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन केले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू होईपर्यंत रायथू बंधू योजना स्थगित राहील, असे आयोगाने म्हटले आहे.