मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने शीवतीर्थावर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. मुंबईचा डान्सबार करु नका. बुडाखाली अंधार दिसतोय. क्षमा कोणालाच करायची नाही. निवडणूक लागू द्या, मग त्यांना दाखवून देऊ. असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. शीवतीर्थावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही दिसुन येत आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "शिवसैनिकांना नम्र विनंती आहे, जे आदेश पक्षाचे आले आहेत, आपण सिनेटच्या निवडणुकीत बऱ्यापैकी जोर लावला. त्यामुळे ही निवडणूक रद्द झाली. आता पदवीधर मतदारसंघ चालू आहे. घराघरात आपला पदवीधर मतदार आहे. आपण संपूर्ण मुंबईचं चित्र बघितलं तर २०२० पासून आजपर्यंत आदित्य ठाकरेंनी जे काम केलं, त्यांच्या बरोबर मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांनी सूचनांचं पालन केलं. त्यामुळे मुंबईत फार कुठे पाणी साचलं नाही. आम्ही मुंबईला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतोय. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी काम केलं."
"तिथे बाळासाहेबांची खुर्ची तिथे आहे. खुर्ची खूप मिळतात. बाळासाहेबांचा आत्मा कुठे आहे ते बोलाना. शिवसैनिकांच्या रुपाने बाळासाहेबांचा आत्मा इथे आला आहे. गुजरातचा कपडा घेऊन महाराष्ट्राचा विद्यार्थी एका गणवेशात पाहिजे असं चाललं आहे. हे तुम्हाला चालणार आहे का? सामान्य जनतेच्या मुलांना मोफत शिक्षण मिळायला हवं. मैदानावरुन जेवढं राजकारण झालं, न्याय व्यवस्था आजही सत्याची बाजू राखून आहे. त्यामुळे कितीही कुरखोडी घातल्या तरी शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरेंना मिळणार. दसरा मेळाव्याला पुढचे ५० वर्षेही हेच मैदान असणार आहे." असा विश्वास पेडणेकरांनी व्यक्त केला आहे.