"काँग्रेस धोकेबाज, त्यांच्या चिरकुट नेत्यांनी आमच्याविरोधात विधाने करु नये" - अखिलेश यादव
19-Oct-2023
Total Views | 65
मुंबई : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताच इंडी आघाडीत वाद सुरु झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला धोकेबाज म्हटले आहे. ते म्हणाले की, "मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाला जागा देण्याचे आश्वासन देऊनही काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे. इंडी आघाडी राज्यात विधानसभा स्तरावर युती करणार नाही हे आम्हाला माहीत असते तर आम्ही आमच्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले नसते आणि त्यांच्या नेत्यांचे फोनही घेतले नसते."
पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, "मध्य प्रदेशात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रात्री एक वाजेपर्यंत समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. आमचे आकडे पाहून त्यांनी आम्हाला सहा जागांचे आश्वासनही दिले, पण यादी जाहीर झाली तेव्हा समाजवादी पक्ष शून्यच राहिला. आघाडीत जागा न देऊन काँग्रेसने आमचा विश्वासघात केला आहे. भविष्यात उत्तर प्रदेश आणि केंद्रात युतीचा मुद्दा आला तर आम्ही त्याचाही विचार करू."
अखिलेश यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष टीका करत होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कोणताही दर्जा नाही. ते पाटणा आणि मुंबईतील बैठकीत होते का? त्यांनी तसे बोलू नये. असे म्हणणारे काँग्रेसवाले भाजपशी जुळवून घेत आहेत. मला काँग्रेसला सांगायचे आहे की, चिरकुट प्रकारच्या छोट्या नेत्यांनी आमच्या पक्षासाठी कोणतेही विधान करू नये.