पुणे : "वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल ते सर्व मी करेन" अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. वारकरी संप्रदायाची परंपरा फार मोठी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून असलेल्या या परंपरेत वाईट शक्तींची घुसखोरी झाली आहे. त्यामुळे आपल्या परंपरेची बदनामी होते आणि हे संप्रदायासाठी घातक आहे असे वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने सांगितले. संप्रदायाच्या सुधारणांसाठी वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
वारकरी संप्रदायातील वाईट शक्तींची घुसखोरी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक कृतिशील कार्यक्रमच आखावा लागेल. हे घुसखोर वारकऱ्यांचा वेशात समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते लोक करत असतात. हे खूप घातक आहे, त्यामुळे या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी काय कार्यक्रम आणि काही चर्चासत्रे वगैरे असे काही कार्यक्रम आपल्याला घेता येतील का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असे शरद पवार आणि वारकरी संप्रदायाच्या चर्चेत ठरवण्यात आले. वारकऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात टिकवण्याचे काम सध्या कीर्तनकारांच्या माध्यमातून होत आहे. हे कीर्तनकारच सध्या वारकऱ्यांची परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही काहीतरी केले पाहिजे ही गरज वारकरी शिष्टमंडळाने बोलून दाखवली.
"महाराष्ट्राच्या गावोगावी जाऊन संतांचे खरे विचार पोहोचवणारे कीर्तनकार हे शेतकरी कुटुंबातून येतात. संताचे विचार टिकावेत, ते नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, नवीन पिढी व्यसनाधीनता किंवा अंधश्रद्धेकडे न झुकता संतांचे विचार आचरणात आणेल, यासाठी कृतिशील कार्यक्रम घेऊन पुढे जावे लागेल," अशा पद्धतीने पुढे जाण्याची गरज शरद पवारांनी बोलून दाखवली. अशा संदर्भाचे ट्विटही केले आहे.