भारताच्या राष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला तर सत्ता पदांवर विराजमान झालेल्या पुरुष नेतृत्वाच्या तुलनेत काही मोजके अपवाद सोडले तर स्त्री नेतृत्त्व फारसं मोठं झालं हे ठळकपणे दिसून येतं. स्त्री नेतृत्व म्हणून जे काही मोजके अपवाद आहेत त्यात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता, उत्तर प्रदेशात मायावती, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तर दिल्लीत सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिलं गेलं. दक्षिणेच्या जहाल राजकारणात एम. जी. रामचंद्रन यांनी निर्माण केलेली जागा त्यांच्या पश्चात कधी कधी रामचंद्रन यांचे समकालीन आणि मित्र असलेल्या करुणानिधींनी व्यापून टाकली तर कधी जयललिता यांनी तामिळनाडूत आपले साम्राज्य दिमाखात प्रस्थापित केले होते.
पण अशा राजकारणात स्त्री असूनही जयललिता यांनी अनेकांना टक्कर देऊन ते स्थान स्वबळावर कमावलं, तसंच काही उत्तर प्रदेशात होतं. काशिराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून मायावतींनी देखील त्यांच्यासारखेच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस फोडून आणि डाव्यांना अंगावर घेत त्यांची तीन दशकांची सत्ता उद्ध्वस्त करुन मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली , पण जयललिता - मायावती आणि ममता या तीनही महिलांना काही ना काही बॅक अप होतं, पक्ष - नेता आणि साधनसूचिता होती म्हणून त्यांना इतरांच्या तुलनेत हे राजकारण सुकर झालं गेलं. मात्र, त्या तुलनेत सुषमा स्वराज यांचा मार्ग खडतर होता.
कसलीही राजकीय अथवा इतर पार्श्वभूमी नसतानादेखील आणीबाणीच्या काळात आंदोलनात सहभागी होऊन, जयप्रकाश नारायण यांच्या विचारधारेला अग्रस्थानी मानून, प्रसंगी लाठ्या खाऊन, संघर्ष करुन स्वकष्ट, प्रचंड अभ्यासू आणि चिंतनशील वृत्तीने व विविध भाषांवर असलेल्या प्रभुत्वाने सुषमा स्वराज भारतीय राजकारणात अढळ स्थान निर्माण करुन गेल्या. ज्या वयात चार मित्रमैत्रिणी घेऊन भटकायचं, बेफ़ामपणे वागायचं असतं, त्या वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सुषमाजी कॅबिनेट मंत्री होत्या. विद्यार्थी चळवळीतील एक बुलंद आवाज म्हणून त्या उदयास आल्या. देशाच्या राजकारणात सासू, सासरा, पती, आई, वडील यांच्या पुण्याईवर नेतृत्त्व केलेल्या आणि करत असलेल्या अनेक महिला झाल्या, होतील पण सुषमा स्वराज यांची जागा व्यापू शकेल असं नेतृत्व आजतरी दूरदूरपर्यंत दिसत नाही.
अवघ्या पंचवीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्री झालेल्या सुषमा काही वर्षांनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आणि पुढे देशाच्या विदेश मंत्री देखील झाल्या. जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या भारतीयाला जर काही अडचण आली तर एका ट्विटवर त्याला सर्वतोपरी मदत केली जायची, ही किमया त्यांनी स्वत: विदेशमंत्री असताना करुन दाखवली होती. राजकारणात 'पर्मनंट' असं काही नसतं, जशी वेळ बदलते तसं नेतृत्त्वही बदलतं. 'नवा गडी नवे राज्य' हे वास्तव स्वीकारून चालणं हेच खऱ्या राजकीय धुरिणांचं लक्षण मानलं जातं आणि हे संकेत सुषमा स्वराज यांनी ओळखले होते. भारतीय जनता पक्षातील नेतृत्व बदल आणि पक्षाच्या कार्यप्रणालीने स्वीकारलेली नवी पद्धत यातून पक्ष ऐतिहासिक कामगिरीच्या मार्गावर मार्गक्रमण करत होता आणि याच सुगीच्या दिवसांमध्ये त्यांनी वेळेआधी स्वत:हून बाहेर पडायचं ठरवलं. यशाचे डोंगर सर करत असताना थांबायचं कुठे हे समजण्यासाठी राजकीय परिपक्वता अंगी असावी लागते आणि त्या परिपक्वतेचे प्रमाण सुषमा स्वराज यांनी आपल्या निवृत्तीच्या निर्णयातून दाखवून दिले होते.
स्व. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी घडवलेल्या दुसऱ्या पिढीत २००९ ते २०१४ दरम्यान सुषमा यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची आव्हानात्मक भूमिका आली होती आणि त्यांनी ती चोखरित्या बजावली सुद्धा. एक आई घर उभं करण्यात मदत करते. मुलं मोठी करते आणि ती कर्तीसवरती झाली की मग सगळी जबाबदारी निर्मोही होऊन मुलांवर सोपवते, याचा भावनेतून सुषमा स्वराज यांनी पक्षकार्य करून सक्रिय राजकारणाला अलविदा केला आणि त्या बाजूला झाल्या. हे बाजूला होणे सोप्पं नसतं आणि नेमकं हेच सुषमांनी हेरलं. त्या थांबल्या, पण थांबल्या ते कायमच्या.
गेल्या अनेक दशकापासून 'कलम ३७०' पासून काश्मीरची सुटका करणं हे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यातील मुख्य उद्दिष्ट होतं. मे २०१९ ला पुन्हा निवडून आलेल्या भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केलं, पंडित श्यामाप्रसाद मुखर्जींचं बलिदान आणि संघ-भाजपच्या अनेक नेत्यांच्या संकल्पाची पूर्ती झाली होती. अशा या ऐतिहासिक गोष्टीचा आनंद सोबत घेऊनच सुषमाजींनी दुसऱ्याच दिवशी स्वर्गारोहण केलं.
दिनांक ६ ऑगस्ट २०१९ च्या संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. विद्यार्थी दशेपासून देशहितासाठी "कार्यारंभ" केलेल्या या "दुर्गा" अवताराचा अंत झाला. संस्कृत, हिंदी, इंग्रजी आणि अशा अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या माँ सरस्वतीच्या रुपाचं या "वाग्देवी"च स्वर्गाच्या दिशेनं प्रस्थान झालं. ३ पेक्षा अधिक दशके देशाच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वकष्टावर ग्राऊंड लेव्हल ते केंद्रीय मंत्री व्हाया मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या पद्मविभूषण सुषमा स्वराज यांना विनम्र अभिवादन..!!