निवडून येण्याची क्षमता नसून देखील केवळ उद्धव ठाकरेंच्या गुडबुक्समध्ये असल्याने मागच्या दाराने विधानभवनात दाखल झालेले अनिल परब, आज आहेत कुठे? कधीकाळी शिवसेनेतर्फे कायद्याचा किल्ला लढवणारे परब स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने तोंडात मिठाची गुळणी भरून गप्प राहिलेत का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात, कारण संजय राऊतांना अटक झाली, तेव्हा परब गप्प राहिले. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत ते कुठेही दिसले नाहीत. हल्ली उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला देखील अनिल परब दिसत नाहीत, तिथे राष्ट्रवादीतून सेनेत आयात केलेले सचिन अहिर दिसतात.
सर्वप्रथम अनिल परबांचे शिवसेनेतील महत्व कसे वाढले ते जाणून घेऊयात -
दिवंगत शिवसेना नेते आणि माजी खासदार मधुकर सर्पोद्दार यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या अनिल परबांना २००१ साली शिवसेनेचे विभागप्रमुख हे पद मिळाले, त्याच्या आधी परब भारतीय विद्यार्थी सेनेत अॅक्टीव्ह होते. बीकॉम झाल्यानंतर कायद्याचा अभ्यास करुन अनिल परबांनी एलएलबीची डिग्री घेतली. पुढे वकिलीचा पेशा सांभाळून आरोग्य शिबिरे घेणे, गरजूंना मोफत वह्या-पुस्तके वाटणे, सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, सर्वसामान्यांना कायद्याचे मोफत सल्ले देणे, अशा सामाजिक कार्याद्वारे पक्ष नेतृत्वाच्या परब नजरेत आले. आणि २००४ साली परबांना शिवसेनेने थेट विधानपरिषदेवर पाठवले.
आता पाहू शिवसेनेसाठी कायद्याने लढणारा नेता, अशी अनिल पराबांची ओळख कशी निर्माण झाली? -
शिवसेना आणि कायद्याचा छत्तीसचा आकडा आहे असे शिवसेनेविषयी बोललं जायचं. परब शिवसेनेच्या वतीने कायदेशीर पेचप्रसंग उद्भवल्यास पक्षाची बाजू अत्यंत हिरीरीने मांडायचे. अगदी भाजपने शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारवरून घेरण्याचा प्रयत्न असो वा माजी विरोधी पक्षनेते व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे असो परब सगळीकडेच आघाडीवर होते. कदाचित त्यामुळेच परिवहन मंत्री म्हणून उल्लेखनिय कामगिरी केलेली नसून देखील त्यांचे पक्षातील महत्व गेल्या काही काळापासून भलतेच वाढले असावे. त्याचे रुपांतर पुढे शिवसेनेतील उठवला कारणीभूत ठरले.
शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोलीच्या रिसॉर्टवर पर्यावरण मंत्रालयाकडून हातोडा पडणार असल्याचं सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळे अनिल परब ईडीच्या रडारवर येणार का तेही जाणून घेऊ. -
दापोलीतील साई रिसॉर्ट खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या संशया खाली अनिल परब यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार लटकलेली आहे. परबांनी दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्याजवळ पुण्यातील विभास साठ्ये यांच्याकडून जमीन विकत घेतली आणि फसवणूक करून रिसॉर्ट बांधले, अशी माहिती मिळाली. या व्यवहारात विभास साठ्ये यांच्या बनावट सह्या केल्या गेल्या, असाही आरोप आहे. २०१७ साली ही जमीन खरेदी केली गेली, त्यासाठी एक कोटी दहा लाखाचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. महिनाभरापूर्वी या प्रकरणी पराबांशी निगडीत अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. सध्या हे प्रकरण खूपच तापलेल आहे.त्यातच संजय राऊत यांच्या नंतर अनिल परब यांची कोठडीत रवानगी होईल असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय.
त्यामुळेचं संजय राऊत यांच्या अटकेच्या वेळी अनिल परब गप्प होते का असा मुद्दा उपस्थित होतो. -
संजय राऊत यांना अटक झाली तेव्हा आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या गडबडीत होते. आता राऊत यांच्या अटकेची उद्धव ठाकरेंना आधीपासूनच कल्पना होती हे ठाकरेंनी स्वतःच स्वतःच्या तोंडाने कबुल केले आहे. त्यामुळे राऊतांच्या अटकेचा मुहूर्त लक्षात घेऊनच आदित्यांच्या शिवसंवाद यात्रेचा कार्यक्रम ठरवला गेला का अशा चर्चा आहेत. राऊतांच्या अटकेवर सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी मौन बाळगणे पसंत केले होते नंतर माध्यमांनी त्यावर प्रश्न उपस्थित केल्यावर उद्धव ठाकरें राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पण शिवसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर तोंडातून चकार शब्द देखील काढला नाही. असो पण त्यावेळी परब गप्प का बसले.
आता प्रश्न उतरो तो परब घाबरलेत की त्यांना शांत बसायला सांगितलं जातंयं का ? -
एरव्ही करण-अर्जुन यांच्या जोडी प्रमाणे राऊत आणि परब यांची जोडी पक्षाची बाजू लाऊन धरण्यात आघाडीवर असायची मात्र राऊत कोठडीत गेल्यावर परबांनी शांत राहणे पसंत केले. त्यामुळे आपल्याला कधीही अटक होऊ शकते, या भीतीने परब हादरलेत का? अशाही चर्चा सुरु आहेत. आता भाजप नेत्यांच्या दाव्य प्रमाणे महाविकास आघाडीतील चौथा आणि शिवसेनेंतील दुसरा नेता तुरुंगात जाणार का? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.