रत्नागिरी : शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची अधिकृत हकालपट्टी झाली. शनिवारी दि. २३ जुलै रोजी खेड तालुक्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची महत्वाची बैठक भरणे नाका येथील हॉटेल बिसू या ठिकाणी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत कदम ढसाढसा रडल्यावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. मात्र, त्यावेळीच आपण आता पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी शिवसेनेसाठीच रस्त्यावर उतरुन तळागाळात काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जातो. त्यामुळे शिंदेगटाने भविष्यात शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी कदमांना साद घातलीा आहे.
संघटनेच्या दृष्टीकोनातून या बैठकीला अत्यंत महत्व प्राप्त झाले असून ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे. एका बाजूला गेल्या महिन्यातच खेड दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सामील झाले, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.