अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या वर बांधलेला दर्गा त्याची देखभाल करणार्यांच्या सहमतीने स्थलांतरित केल्यानंतर शनिवारी मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकावला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “महाकाली मंदिरात फडकावलेला ध्वज केवळ आध्यात्माचा प्रतीक नसून शतकानुशतकांचा काळ लोटल्यानंतरही आपली श्रद्धा किती बळकट आहे, हे दाखवतो. महाकाली मंदिराच्या वर पाच शतकांपर्यंत, इतकेच नव्हे, तर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही कधी ध्वज फडकावला गेला नाही,” असेही त्यांनी सांगितले.
इथल्या महाकाली मंदिराचा कळस जवळपास ५०० वर्षांपूर्वी सुलतान महमूद बेगडाने उद्ध्वस्त केला होता. पावागढ पर्वतावर ११व्या शतकात या मंदिराची निर्मिती करण्यात आली होती, तर आता पुनर्विकास योजनेंतर्गत मंदिराचा कळस पुन्हा स्थापित करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी शनिवारी पुनर्विकसित महाकाली मंदिराचे शनिवारी उद्घाटन केले. महाकाली मंदिर चंपानेर-पावागढ पुरातात्विक उद्यानाचा भाग असून, ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही आहे. इथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या एका अधिकार्याने माहिती देताना सांगितले की, मंदिराचा मूळ कळस सुलतान महमूद बेगडाने १५व्या शतकात चंपानेरवर केलेल्या हल्ल्यावेळी उद्ध्वस्त केले होते.
कळस उद्ध्वस्त केल्यानंतर काही काळाने मंदिराच्या वर पीर सदनशाहाचा दर्गा तयार करण्यात आला. पुढे ते म्हणाले की, ध्वज फडकावण्यासाठी स्तंभाची वा कळसाची आवश्यकता असते. पण मंदिराला कळस नव्हता, म्हणून इतकी वर्षे इथे ध्वज फडकावता आला नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी पुनर्विकास कार्य सुरू झाल्यावर आम्ही दर्ग्याची देखभाल करणार्यांना दर्ग्याला स्थलांतरित करण्याची विनंती केली, जेणेकरून मंदिराच्या कळसाची उभारणी करता येईल. ते पुढे म्हणाले की, “सौहार्दाच्या भावनेने दर्ग्याला मंदिराच्या जवळपासच स्थलांतरित करण्याचा तोडगा काढण्यात आला. दरम्यान, १२५ कोटींच्या खर्चासह महाकाली मंदिराचा पुनर्विकास करण्यात आला आहे. यात पर्वतावर स्थित मंदिराच्या पायर्यांचे रुंदीकरण, आसपासच्या भागाचे सौंदर्यीकरण सामील आहे. नवा मंदिर परिसर तीन स्तरांत तयार करण्यात आला असून ३० हजार वर्ग फुटांच्या परिघात आहे.