जयपूर : जोधपूर जिल्ह्यातल्या जलोरी गेट परिसरात सोमवारी (दि. २ मे) ईदच्या आदल्या दिवशी दोन गटांत हिंसाचार झाला. भगवान परशुराम जयंती आणि ईद हे एकाच दिवशी आल्याने आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पुतळ्यावर ध्वज फडकवल्याच्या वादातून हिंसाचार झाला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, भाजपचे आमदार सूर्यकांत व्यास यांच्या घराबाहेर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना पेटविण्याची प्रयत्न केला. हा हिंसाचार सुरु असतानाच तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले व त्यांना अटक करण्यात आली. पहाटेपर्यंत हा हिंसाचार सुरू असताना तो पांगविण्यासाठी संतप्त जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे. पहाटेपर्यंत सुरु असलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले. थोड्या वेळासाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येईल.