मुंबई(प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तीव्र चक्रीवादळ 'असनी' आता वादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आणि गुरुवारी सकाळपर्यंत विरण्याची शक्यता आहे. आंध्रमध्ये बर्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 'चक्रीवादळ असनी' हे मछलीपट्टणमच्या आग्नेयेकडे सुमारे ४० किमी, काकीनाडापासून १४० किमी नैऋत्येस आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून २८० किमी नैऋत्येस आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास वादळ ६ किमी प्रतितास वेगाने पुढे जात होते.
आज संध्याकाळपर्यंत ते नरसापूर, यनम, काकीनाडा, तुनी आणि विशाखापट्टणम किनार्यांसह उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि आज रात्रीपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश किनार्यापासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांना ११ मे रोजी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनार्याजवळ आणि १२ मे पर्यंत वायव्य बंगालच्या उपसागरात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.