ठाणे : ठाणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, शिवसेना पदाधिकार्याकडून सातत्याने येणार्या धमक्यांमुळे शिवसेनेचा ठाण्यातील एक शाखाप्रमुख तीन दिवसांपासून गायब आहे. या गंभीर प्रकाराकडे भाजप आ. निरंजन डावखरे यांनी नुकतेच विधान परिषदेचे लक्ष वेधले. तसेच,शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्याची विनंतीही त्यांनी सभापतींकडे केली. ठाणे शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.
ठाण्यातील स्वामी विवेकानंद नगरचे शिवसेना शाखाप्रमुख मनोज नारकर यांना जेरी डेव्हिड याच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या मित्र व नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. या प्रकाराला कंटाळून मनोज नारकर हे घरातून निघून गेले आहेत. त्यांनी घर सोडताना लिहिलेल्या चिठ्ठीत जेरी डेव्हिड याचा उल्लेख केला आहे. जेरी डेव्हिडकडून पैसा व सत्ता या जोरावर पोलीस प्रशासन आपल्या खिशात असल्याचा दावा केला जात असल्याचे नारकर यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी केवळ व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.