महाराष्ट्रात रोज एका तरी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आपल्या कानावर येत असते. कर्जाच्या बोजाखाली दडपून गेल्यामुळे शेतकरी आत्महत्या सारखे मोठे पाऊल उचलतो. सन २०२० मध्ये तर विविध कारणांचे निमित्त होऊन तब्बल ५ लाख ९७९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. असेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, त्यांच्या असणाऱ्या समस्या, सरकारी पातळीवर शेतकऱ्यांची होणारी फरफट, आपल्या सिस्टमचे विस्कटलेले स्वरूप आणि त्यामध्ये सापडून शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यामध्ये होरपळून निघणारे त्यांचे कुटुंब, अशाच वास्तववादी मुद्दय़ांवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजेच 'फास'. हा चित्रपट शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अविनाश कोलते याने हा चित्रपट दिग्दर्शित केला असून या चित्रपटाची निर्मिती माँ एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली माहेश्वरी चाकूरकर पाटील यांनी केली आहे.
या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देखील गौरवण्यात आले आहे. या चित्रपटातून बळीराम या शेतकऱ्याची कथा मांडण्यात आली आहे. बळीराम (कमलेश सावंत) हा शेतकरी असून तो आपली पत्नी लक्ष्मी (पल्लवी पालकर) आणि आपल्या दोन मुलांसह राहात असतो. त्याची परिस्थिती अतिशय बेताची असते. आपल्या पत्नी आणि आणि मुलांची कोणतीही हौसमौज करण्याची त्याची परिस्थितीच नसते. गरीबीच्या जात्यात तो रोज भरडला जात असतो. गरिबीमुळे त्याची मुले कोणतीच मोठी स्वप्ने पाहू शकत नसतात. तसेच त्याच्या पत्नीला देखील आपली कोणतीच आवड जपता येत नसते. बळीराम त्याच्या या हलाखीच्या परिस्थितीमळे हतबल होऊन एक दिवस गळफास आत्महत्या करतो.
त्याच्या आत्महत्येची बातमी संपूर्ण गावात पसरते आणि एक पोलिस अधिकारी (उपेंद्र लिमये) बळीरामच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी त्या गावात येतो. त्यानंतर सरकारी यंत्रणा आणि आपल्या सिस्टीमच्या ढोबळ कारभारामुळे बळीरामच्या कुटुंबाची आणि गावकऱ्यांची होणारी फरफट याचे हृदयद्रावक दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या पूर्वी देखील गाभ्रिचा पाऊस, कापूस कोंड्याची गोष्ट अश्या चित्रपटांमधून शेतकऱ्यांची वास्तववादी परिस्तिथी दर्शवण्यात आली आहे.
परंतु इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाच्या विषयात एक प्रकारचे नावीन्य असून हा चित्रपट पाहताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच जाणवते की, हा 'फास' म्हणजे फक्त शेतकऱ्याच्या गळयाभोवती आवळलेला फास नसून समाजाच्या आणि सिस्टीमच्या गळ्याशी आवळलेला फास आहे. लेखिका माहेश्वरी चाकूरकर पाटील यांनी हा विषय आपल्या लेखणीतून उत्तमरीत्या मांडलेला आहे. तसेच कमलेश सावंत, उपेंद्र लिमये आणि सयाजी शिंदे यांसारखे मराठी मधील कसलेले कलाकार आणि मराठी व हिंदीमध्ये काम करणारे अनुभवी कलाकार यांनी देखील आपापल्या भूमिकांना पूर्णपणे न्याय दिला आहे.
कमलेशने एका शेतकऱ्याचे दुःख, त्याच्या समस्या आणि वेदनांना आपल्या भूमिकेमधून योग्यप्रकारे न्याय दिला आहे. तर एका कर्तव्यदक्ष आणि जबाबदार अश्या पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात उपेंद्र लिमये आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर गणेश चंदनशिवे, पल्लवी पालकर, नामदेव पाटील, नीलेश बडे, शरद काकडे, पवन वैद्य या कलाकारांनीसुद्धा आपापल्या भूमिकेला चोख बजावले आहे. रमणी रंजन दास यांनी केलेली चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे.
कोणत्याही वास्तववादी कथेसाठी पटकथेचीही उत्तम साथ असणे हेही तितकेच महत्वाचे असते. परंतु नेमकं याबाबतीतच दिग्दर्शक काही प्रमाणावर कमी पडल्याचे दिसून येत आहे. चितपटामध्ये शाब्दिक भडिमार हा अधिक असल्याचे दिसते. परंतु तरीही शेतकऱ्यांचं दुःख, त्यांच्या वेदना आणि त्यांची होणारी हतबलता, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची होणारी फरफट या सर्वांचे अंगावर काटा आणणारे चित्रण म्हणजे या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सिस्टिममुळे लोकांना होणारा नाहक त्रास हे कुठल्याही प्रकारे तडजोड न करता दर्शविण्यात आले आहे. शेतकऱ्यांची एक आर्त हाक या चित्रपटातून आपल्याला नक्कीच ऐकू येते.