मुंबई : रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी एकाचवेळी दक्षिण मुंबईतला अनेक ठिकाणचा विजपुरवठा पुन्हा एकदा खंडीत झाला होता. यासंदर्भात भाजप नेते विश्वास पाठक यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. "राज्याची यंत्रणा पुन्हा एकदा निष्कामी!", असे म्हणत त्यांनी ऊर्जामंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
"ऑक्टोबर २०२० मध्ये अशाचप्रकारे विजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती रविवारी पुन्हा पहायला मिळाली. अशा घटनांच्या अनूभवातून आपण काहीतरी शिकायचं असतं. केवळ उच्चस्तरिय समित्या गठीत करून चालत नाही. त्यांच्या अंमलबजावणींचं काय झालं याबाबत न सांगता ऊर्जामंत्र्यांनी पुन्हा एकदा उच्चस्तरिय समिती गठीत करण्यासंदर्भात सांगितले.", असे विश्वास पाठक यावेळी म्हणाले.
"जेव्हा आपण देखभालीचं काम काढतो, त्यावेळी यंत्रणेनं डोळ्यात तेल घालून ते काम पूर्ण केलं पाहिजे. तसं न झाल्याने रविवारी त्याची पुनरावृत्ती घडली आहे. विजेचा लोड कमी असतानादेखील यंत्रणेकडून व्यवस्थापित करता आले नाही. याचाच अर्थ म्हणजे, राज्याची यंत्रणा ही पूर्णतः निष्कामी आणि अकार्यक्षम आहे. उर्जासचिवांनीही स्वतः यात जातीने लक्ष घालणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही.", असेही ते पुढे म्हणाले.