नेताजींच्या शौर्यगाथांचे ‘सुभाष बावनी’

    19-Feb-2022
Total Views | 202

Subhash Bawani
 
 
 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रावर खरंतर विपुल आणि विस्तृत लेखन ‘सुभाष बावनी’ या पुस्तकातून नव्या दमाचे तरुण लेखक अंबरीष पुंडलीक यांनी मांडले आहे. या पुस्तकाच्या रूपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिगाथा वाचकांच्या भेटीला आली असून दि. २३ जानेवारी या दिवशी नवीन अध्यायाची सुरुवात झाली.
 
 
 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रावर खरंतर विपुल आणि विस्तृत लेखन ‘सुभाष बावनी’ या पुस्तकातून नव्या दमाचे तरुण लेखक अंबरीष पुंडलीक यांनी मांडले आहे. या पुस्तकाच्या रूपाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ललित क्रांतिगाथा वाचकांच्या भेटीला आली असून दि. २३ जानेवारी या दिवशी नवीन अध्यायाची सुरुवात झाली. विद्यमान केंद्र सरकारने नेताजींच्या जयंती दिनापासून प्रजासत्ताक दिनाच्या सप्ताहाची सुरूवात केली. नेताजींच्या १२५व्या जयंतीनिमित्त नवी घोषणा ही झाली. तसेच लवकरच नेताजींची इंडिया गेटजवळ भव्य ग्रॅनाईट मूर्ती स्थापन केली जाणार आहे. या घडामोडी होत असतानाच, २३ जानेवारी रोजी मराठीतील नेताजींच्या पुस्तकांत नव्या दर्जेदार पुस्तकाची भर पडली.२३ जानेवारीला ’सुभाष बावनी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. आज सोशल मीडियावरदेखील एखादा विषय वर्षभर सातत्याने लिहिण्यासाठी चिकाटी लागते. एखाद्या विषयाची कमी वेळात माहिती करून देण्यासाठी दर आठवड्यात एक हजार शब्दांचा लेख याप्रमाणे वर्षातील ५२ आठवडे नियमितपणे सोशल मीडियावर लेख लिहिणे, तसे सोप्पे नाही. पण, लेखकाने हे व्रत समजून ते लेख प्रकाशित केले आणि पुढे वर्तमानपत्रांतूनही अधिक भर घालून लेख प्रकाशित झाले. नेताजींच्या १२५व्या जयंतीवर्षाची सांगता होत असताना या लेखांचे संकलन असलेले पुस्तकरूपाने लेखकाने वाचकांच्या भेटीला आणले आहे.
 
 
 
या पुस्तकातील वेगळेपण म्हणजे लेखक अंबरीष पुंडलीक यांनी विमान अपघात व त्यानंतरच्या रहस्यावरही अभ्यासपूर्ण लिखाण केले. नेताजींचा विमान अपघात अस्तित्व सूचित करणार्‍या प्रस्तुत पुस्तकातील कथा या कल्पनाविलास नाहीत. नेताजींच्या रहस्यमय अस्तित्वाच्या, भारत प्रवेशाच्या, भारतात भूमिगत राहून केलेल्या कार्याच्या, ज्या अस्पष्ट खुणा आपल्या लिखाणातून दाखवून दिल्या आहेत, त्या तर्काने जोडण्याचा प्रयत्न ‘सुभाष बावनी’तील ५२ लेखांमध्ये केला आहे. या लेखनाची आवश्यकता वाटण्याचे एक कारण असे की, सध्या उपलब्ध असलेली नेताजींची चरित्रे वाचल्यावर सामान्यतः वाचकांचा असा समज होतो की, महायुद्धाच्या रणांगणात झुंजत असताना नेताजींनी आणि आझाद हिंद सेनेने असामान्य साहसाचा प्रत्यय दिला. पण,त स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नात मात्र ते अपयशी झाले. १९४२च्या ’चले जाव’ आंदोलनामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून नेताजींच्या ’आझाद हिंद सेने’च्या पराक्रमामुळे आणि त्यांच्यावर चाललेल्या राजद्रोहाच्या खटल्यामुळे ब्रिटिश सैन्यात द्रोहाची भावना निर्माण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्य मिळाले, हे सत्य लेखकाने नाट्यमय पद्धतीने वर्णित केले आहे.
 
 
 
‘दि. १८ ऑगस्ट, १९८५ या दिवशी विमान दुर्घटनेत नेताजींचा मृत्यू झाला’ या वृत्तात आणि घटनेच्या साक्षीदारांच्या जबान्या-अपघाताच्या सांगितल्या गेलेल्या तारखा, तसेच इतर तपशीलात असणार्‍या अनेक विसंगती; या विसंगतींकडे चौकशी समित्यांनी केलेली डोळेझाक आणि त्यात झालेला राजकीय हस्तक्षेपाचा आभास, यावर अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी बरेच संशोधन केले आणि ’...आणि या सर्व अभ्यासक आणि संशोधकांच्या पुस्तकांची मदत घेत नेताजींचा मृत्यू दि. १८ ऑगस्ट, १९४५ या दिवशी विमान अपघातात झालेला नसून दि. १७ सप्टेंबर, १९८५ या दिवशी फैजबाद येथे झाला आहे. फैजबाद येथील गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होत,’ हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. पुस्तकाची सुरुवात दोन मित्रांच्या संभाषणाने होते. ‘नेताजी’ विषयाची व्याप्ती आणि पुढे आध्यात्मिक उन्नतीसाठी घरातून परागंदा होऊन तीर्थक्षेत्रं धुंडाळणारा अवखळ मुलगा. ‘आयसीएस’सारख्या सुखाच्या आणि सन्मानाच्या नोकरीवर लाथ मारून भारतमातेच्या मुक्तीसाठी फकिरी स्वीकारणारा मेधावी तरुण, गांधीजींसारख्या दिग्गजांसोबत असणारे मतभेद जाहीरपणे सांगण्यास न कचरणारा नेता, शिवचरित्राचा फक्त जयजयकार न करता त्याचं अनुकरण करणारा धाडसी देशभक्त. भारतमातेला गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी ६० सहस्र सैनिकांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून भारताच्या ईशान्य सीमेवर धडका मारणारा रणयोद्धा आणि जीवंतपणी भूतकाळात फेकला गेलेला अनाम संन्यासी... सामान्य माणसाच्या दृष्टीला आपल्या बहुरंगी, तेजःपुंज चरित्र घटनांनी दीपवून टाकणारा शौर्यभास्कर म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या प्रकाशाचे ५२ गवाक्षांतून वाचकांच्या अंगणात उतरलेले कवडसे म्हणजे ‘सुभाष बावनी’ हे पुस्तक आहे.
 
 
 
या पुस्तकात फक्त चरित्र संक्षिप्त करून मांडणे एवढाच मर्यादित उद्देश नाही. सुभाषचंद्र बोस यांनी दि. २१ ऑक्टोबर, १९४३ रोजी ‘आझाद हिंद सरकार’च्यावतीने स्वतंत्र भारताच्या पहिल्या हंगामी सरकारची घोषणा केली. सिंगापूर येथे त्याचा जाहीरनामाही काढला होता. याच दिवशी सुभाषचंद्र बोस ’नेताजी’ झाले. या पुस्तकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रातील काही चित्रे बघून अभिमान वाटतो आणि लेखाची वेगळी बाजू त्या चित्रातून आपल्याला जाणवते. चित्रकार देवानंद जोशी यांनी त्या त्या क्षणांची चित्रं फार सुरेख साकारली आहेत. खरंतर काही ठिकाणी काल्पनिक संवादाचा उपयोग करत लेखकाने चरित्र नायकाचे प्रसंग फारच जीवंत केले आहे. एकदा पुस्तक हाती घेतल्यावर ते संपवूनच आपण बाजूला ठेवतो. अतिशय योग्य मांडणी आणि संदर्भासहित माहितीचा खजिना असलेले हे पुस्तक पाहताक्षणीच संग्रही असावे, असे वाटते. मुखपृष्ठ आणि बांधणी, उत्तम शब्दछपाई यामुळे पुस्तक अधिक चांगले झाले आहे. याबद्दल ‘मोरया प्रकाशना’चे विशेष अभिनंदन. वाचकवर्ग या पुस्तकाला उदंड प्रतिसाद देईल, हा विश्वास आहे. नेताजींचे चाहते, रहस्यमयी सत्यघटनांवर आधारित साहित्य वाचनाची आवड असणार्‍या प्रत्येकाने आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे, असे पुस्तक म्हणजे ‘सुभाष बावनी!’
 
 
 
- सर्वेश फडणवीस  
 
 
 
पुस्तकाचे नाव : सुभाष बावनी
लेखक : अंबरीष पुंडलीक
प्रकाशक : मोरया प्रकाशन
पृष्ठसंख्या : ३१७
मूल्य : ३५० रु.
(पुस्तकासाठी संपर्क - +९१८६००१६६२९७)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121