अलिबाग: रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार झगडा जुंपलं आहे. रायगड जिल्हा पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरेंना हटवण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी मोहीम उघडली आहे. गुरुवारी अलिबाग येथे झालेल्या शिवसेनेच्या आजी- माजी आमदार, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा ठराव पास करण्यात आला. या घटनेने महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाही हे उघड झाले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार तर राष्ट्रवादीचा एकाच आमदार आहे. तरीही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे गेल्याने जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये असंतोष होता. पालकमंत्री अदिती तटकरे या शिवसेना नेत्यांना सातत्याने डावलत असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. या असंतोषाला पहिल्यांदा महाडचे आमदार भरत गोगावले यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेऊन वाचा फोडली. आता जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी त्यांना सामील झाले आहेत. "येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पालकमंत्री हटवण्याची मागणी करणार" असे आमदार भारत गोगावले यांनी सांगितले.