पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जुन्नर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शंभर फुटी भव्य तिरंगा घेऊन पदयात्रा काढण्यात आली. जुन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी पदयात्रा काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून नवीन बस स्टॅन्ड, कृषी बाजार समिती, धान्य बाजार, नेहरू बाजार, सदा बाजार या मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत जुन्नर शहरामध्ये विद्यार्थी व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा धरून या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. ‘गाव गाव मे जायेंगे, भारत नया बनायेंगे’ या घोषणेने जुन्नर शहर दुमदुमले. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही या पदयात्रेवर फुलांचा वर्षाव करत आपला सहभाग नोंदवला.

पदयात्रेचा समारोप जुन्नर नगर परिषद येथे झाला. अभाविप पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी यावेळी ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष’ हा विषय मांडला. "भारताचे हे अमृत महोत्सवी वर्ष जरी असले, तरी भारत हा काय ७५ वर्षांचा नाही तर भारत हा अनादि अनंत काळापासून आहे. भारताने जगाला आयुर्वेद दिला, योग दिला, शून्य दिला असा आपला जाज्वल्य इतिहास, ज्ञानाची शौर्याची व त्यागाची वैभवशाली परंपरा व संताची मांदियाळी असलेल्या या सर्वांकडून विश्वाला मार्गदर्शन करण्याची भावना व ताकद भारत देशामध्ये आहे.", असे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
यावेळी अभाविप पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत, जिल्हाप्रमुख प्रा.मनोहर चव्हाण, उत्तर पुणे जिल्हा संयोजक गणेश पाडेकर, प्रदेश कार्यकरिणी सदस्य प्रसाद आठवले, शहरमंत्री प्रणिती भवाळकर, अभाविप पूर्व कार्यकर्ते नगरसेवक नंदू भाऊ तांबोळी, हरीश भवाळकर, सचिन कालेकर , अरुण कबाडी, अंकुश पानसरे उपस्थित होते