मुंबई ( Anand Teltunde ): भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एनआयएनं (NIA) या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्यानं, उच्च न्यायालयाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव लढाईला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंसाचार उसळला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला असून १० पोलिसांसह अनेकजण जखमी झाले आहेत. भीमा-कोरेगाव संघर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यव्यापी बंद दरम्यान, पोलिसांनी १६२ जणांवर ५८ गुन्हे दाखल केले होते.
३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात भडकाऊ भाषणे करण्यात आली व त्यातून पुढे कोरेगाव-भीमा येथे दंगल उद्भवली, असा आरोप आहे. याप्रकरणी एप्रिल २०२० मध्ये आनंद तेलतुंबडेला अटक करण्यात आली होती. आनंद तेलतुंबडे सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहे ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात आपण उपस्थित नव्हतो आणि आपण कोणतंही भडकाऊ भाषणही केलं नव्हतं, असं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.
आनंद तेलतुंबडे याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनआयएनं (NIA) या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्यानं व त्याला परवानगी मिळाल्याने तेलतुंबडेला आठ दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे, अशी माहिती मिळाली.