नवी दिल्ली : नुकतेच उरी हल्ल्याला ५ वर्षे पूर्ण झाली. यावेळी भारतीय लष्कराने मोठे यश मिळवत जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला ठार केले. तर, या चकमकीदरम्यान एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई करत लष्कराने उरीसारख्या दुसर्या हल्ल्याचा कट उधळून लावला. विशेष म्हणजे सीमा रेषेवर गेल्या ९ दिवसांपासून ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत ७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असे १९ पायदळ विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जनरल वीरेंद्र यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, "१८ सप्टेंबर रोजी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. सैन्याने गस्त घालत असताना सीमा रेषेवर घुसखोरीची शंका आली होती. यादरम्यान चकमक सुरू झाली आणि यावेळी दोन दहशतवादी सीमा रेषेत घुसले. तर चार दहशतवादी त्याच बाजूला राहिले. भारतीय हद्दीत घुसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अतिरिक्त बळाचा वापर करण्यात आला. दरम्यान, या कारवाईत २५ सप्टेंबर रोजी चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आणि दुसरा पकडला गेला. अटकेत असलेल्या दहशतवाद्याने आपले नाव अली बाबर असल्याचे सांगितले. हा १८ वर्षीय दहशतवादी मूळचा पाकिस्तानमधील पंजाबचा आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित असून त्याने मुझफ्फराबादमध्ये प्रशिक्षण घेतले होते."
"दहशतवाद्यांच्या इतक्या मोठ्या गटाची हालचाल पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. एलओसीच्या त्या बाजूला लाँच पॅडवर सतत हालचाल सुरू असते. गेल्या सात दिवसांत आम्ही ७ दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती जनरल वीरेंद्र यांनी दिली. अटकेत असलेल्या दहशतवाद्यांकडून एके मालिकेची ७ शस्त्रे, ९ पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि ८० हून अधिक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्याकडून पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहे.