कोरोना महामारीचा जगभरातील सर्वच उद्योग-व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आणि त्यापासून माध्यमविश्वाचीही सुटका झाली नाही. तेव्हा, कोरोनाकाळातील माध्यमांवर ओढवलेल्या संकटाचे स्वरुप, माध्यमांनी या संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गाबरोबरच माध्यमांचे भवितव्य नेमके कसे असेल, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
गेल्या दीड-पावणेदोन वर्षापासून संपूर्ण जग या ‘कोविड-१९’च्या साथीच्या आजारामुळे त्रस्त आहे. आपल्या जीवनातील सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम झालेला दिसतो. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक असे अनेक बदल या काळात झाले आणि जगातील जवळजवळ सर्वच उद्योगधंद्यांना याची झळ पोहोचली आहे. मग यापासून माध्यम क्षेत्र किंवा माध्यम व्यवसाय हे कसे वंचित राहू शकतात? ‘पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री’च्या अहवालानुसार, या ‘कोविड’चा माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, या साथीमुळे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा आऊटडोर मीडिया आणि इव्हेंट या सगळ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. या ‘कोविड’च्या साथीमुळे ज्या ज्या क्षेत्रांवर खूप मोठा परिणाम झाला, त्यापैकी प्रसारमाध्यम हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणात झळ पोहोचलेला, असा प्रिंट मीडियाचा उद्योग आहे की ज्यांच्या जाहिरातीच्या उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अनेक वृत्तपत्रे किंवा काही मासिके ही या काळात बंद झाली. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनासुद्धा जाहिरातीच्या उत्पन्नामध्ये प्रचंड नुकसान सहन करावे लागले आणि ‘लॉकडाऊन’मुळे रस्त्यावर रहदारी नसल्याने ‘आऊटडोअर’ मीडियासंबंधित उद्योगधंद्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. एक प्रकारची अस्थिरता सगळ्या माध्यम व्यवसाय क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते. रेडिओ, टीव्ही, प्रिंट मीडिया, आऊटडोर मीडिया यांच्या जाहिराती उत्पन्नामध्ये सध्या लाक्षणिक घट झाल्याचे हे परिणाम.
या विषयाचे विश्लेषण ज्यावेळेस आपण करू, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर याची काय परिस्थिती आहे, ही बाब सुद्धा आपण ध्यानात घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कदाचित काही नवीन संधी आणि नवीन आव्हाने यांचा विचार करणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करण्यापूर्वी जागतिक पातळीवर अजून कोणती धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, याचा विचारदेखील आवश्यक आहे. जवळजवळ सर्वच देशांनी गेल्या दीड वर्षामध्ये ‘कोविड’मुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही प्रमाणात ते यशस्वीदेखील झाले आहेत. मात्र, या सगळ्यात शासनाकडून काही अशी पाऊले उचलली गेली, ज्यामुळे प्रेसची स्वायत्तता धोक्यात आली आणि अगदी ब्राझिलपासून ते पाकिस्तानपर्यंत आपल्याला अशा पद्धतीची टीका दिसून येते. एकीकडे वृत्तपत्र, रेडिओ, दूरचित्रवाणीवरील वाहिन्या आणि वेबसाईटवर ज्या बातम्या येत होत्या, त्यामुळे त्या परिस्थितीची भयानकता दिसत होती. दुसरीकडे सार्वजनिक स्तरावर निषेध व्यक्त होत होता. त्यामुळे अनेक लोकशाही असलेल्या आणि नसलेल्या देशातील सत्ताधारी नेत्यांमध्येसुद्धा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे सत्य सांगण्याऐवजी ते लपवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला गेला. त्यामुळे आपण बघतो की, खूप ठिकाणी धोरणात्मकरीत्या काही वृत्तपत्र व माध्यम बंद केली गेली. महाराष्ट्रामध्येसुद्धा अनेक वृत्तपत्रांनी त्यांच्या आवृत्या बंद केल्या. अनेक वाहिन्यांनी त्यांचे प्रसारण बंद केले आणि या सर्वांचा भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर एकत्रित परिणाम होऊन जवळजवळ दोन लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
मोठ्या माध्यम समूहांची भागीदारी आणि नियंत्रण
‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘फेसबुक’, ‘अॅमेझॉन’, ‘अॅपल’ किंवा काही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या यांच्याकडे अजूनही प्रचंड पैसा आहे आणि या ‘लॉकडाऊन’च्या काळामध्ये महसूल कमी झाला असला, तरी त्यांचा व्यवसाय सुरू होता. त्याचीच परिणती अशी झाली की, भारतामध्येसुद्धा ‘गुगल’, ‘फेसबुक’ किंवा ‘अॅमेझॉन’ने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आणि काही कंपन्यांचे भागभांडवलसुद्धा त्यांनी खरेदी केले. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होणारच, मात्र भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगालाही त्याची मदत होईल. एका सर्वेक्षणानुसार, माध्यम आणि मनोरंजन व्यवसायामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि बरेचसे लोक आता नवीन माध्यमांकडे वळले आहेत. हे कोरोनानंतरच्या काळात असंच सुरू राहणार का, हे आपण आता सांगू शकत नाही. मात्र, सध्या तरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वैविध्यपूर्ण आणि जागतिक प्रेक्षकांना कार्यक्रम देण्याची क्षमता असणारे असे डिजिटल व्यासपीठ तयार झालेले दिसते. फ्रान्समध्ये ज्यावेळेस भारतातील ‘सेक्रेड गेम्स’ दिसतो किंवा तुर्कीमध्ये जो कार्यक्रम लोकप्रिय होतो, ते हिंदीत भारतामध्ये बघितले जातात. त्यावेळेला आपल्याला याची व्याप्ती समजून येईल. पण, या सगळ्यामध्ये वर्चस्व फक्त मोठ्या कंपन्यांचे आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो आणि तसे काही सौदेसुद्धा आपल्याला दिसून येतील.
‘वॉल्टडिझनी’ या कंपनीने तीन मोठे ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म-‘हॉटस्टार’, ‘डिझनी प्लस’ आणि ‘हुलू’ यांच्यावर नियंत्रण मिळवले आहे. ‘नेटफ्लिक्स’चा नफा कित्येक पटीने वाढलेला आहे. भारतातील ‘नेटफ्लिक्स’च्या ग्राहकांची वाढती संख्या आपल्याला या आधारे नक्कीच दिसून येते. अर्थात, भारतामध्ये ‘नेटफ्लिक्स’ किंवा ‘अॅमेझॉन’ला होणारा फायदा यामागील खूप मोठे कारण म्हणजे, भारतामध्ये असणारी प्रचंड प्रेक्षकसंख्या. या प्रेक्षकसंख्येमुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र, दुसरीकडे दूरचित्रवाणीच्या महसुलामध्ये जवळजवळ २० ते ४० टक्के महसूल कमी झाला आहे आणि वृत्तपत्रांचा विचार केल्यास वृत्तपत्र व इतर प्रिंट मीडियामध्ये जवळजवळ ७० ते ८० टक्के नुकसान झालेले दिसून येते. त्याच्यामुळे बरीचशी माध्यमं बंद झाली. चित्रपटांविषयी विचार केल्यास अनेक ’सिंगल स्क्रीन’ सिनेमा बंद झाले किंवा आता ते विकायला काढले गेले आहेत आणि ज्या निर्मिती संस्था आहेत, त्यांचेसुद्धा अधिग्रहण झालेले आहे किंवा सुरू आहे अथवा खूप मोठ्या प्रमाणावर विलिनीकरणसुद्धा होते आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.
माध्यम उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाययोजना
आज जवळजवळ दीड वर्षानंतरसुद्धा जागतिक स्तरावर माध्यम उद्योग अजूनही या आर्थिक त्सुनामीशी झुंज देत आहे. ब्राझिल, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा अविकसित राष्ट्रांमध्ये हे आव्हान खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आपल्याला दिसून येईल. त्यामुळे त्यात पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यानेसुद्धा अनेक माध्यमांनी आपल्या भविष्यातील विस्ताराचा कार्यक्रम बंद ठेवला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भविष्याचा विचार करत असताना सद्यस्थिती कशी आहे, याचा पूर्णत: विचार करणे आवश्यक आहे आणि तो विचार करत असतानाच आपल्याला वेगवेगळी माध्यमे सध्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जात आहेत, याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणे महत्त्वाचे ठरेल. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी माध्यमांनी ‘एफकेटी’ सध्याच्या या अल्पकालीन आपत्ती व्यवस्थापनाचा विचार न करता, दीर्घकालीन विचार करणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला माध्यमांतील प्रत्येक विभागाचा विचार करावा लागेल.
गुंतवणूक आता कशी आहे, पुढे कशी होऊ शकते, याचा विचार करावा लागेल. काही नवीन करार करावे लागतील आणि प्रसंगी कदाचित कर्जसुद्धा घ्यावे लागेल. ज्यावेळेस आपण येणार्या काळामध्ये पुन्हा माध्यमांच्या बाजारपेठेचा विचार करतो, तेव्हा आपल्याला आता सध्याचे कर्मचारी कोण आहेत, त्यांच्या नोकर्या शाबूत आहेत का, त्यांना आपण जे वेतन देत आहोत, त्यामध्ये ते सुखी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याचप्रमाणे आपण अधिक उत्पन्न कसे मिळवू शकतो, हा विचार करावा लागेल आणि यासाठी अर्थातच शासनाचीसुद्धा खूप मोठी मदत या माध्यम व्यवसायाला लागणार आहे. त्यामुळे माध्यम व्यवसायातील ज्या अग्रणी कंपन्या आहेत, त्यांनी सरकारशी थेट चर्चा करणे आवश्यक आहे. काही थेट गोष्टी ज्या व्यवस्थापनाशी संबंधित असतात, त्याबद्दल पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे. विद्यमान जाहिरातदार आणि इतर ग्राहकांशी संबंध कायम ठेवले तर भविष्यामध्ये त्यांना परत येणे सोप्पे होईल.
आशय, जनहित आणि ग्राहकांवर लक्ष देणे महत्त्वाचे
आपल्या माध्यमामधील जो आशय आहे, तो आशय अधिक चांगला कसा होईल, यासाठी माध्यमांनी प्रयत्न करायला पाहिजे. या ‘कोविड’च्या काळामध्ये जनहितासाठीची पत्रकारिता पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे ती जनहिताची पत्रकारिता तशीच पुढेसुद्धा सुरू राहणे आवश्यक आहे आणि त्याला टिकवून ठेवण्याची रणनीती तयार करणे गरजेचे आहे. आपल्याला आपल्या माध्यमासाठीच मजकूर किंवा आपले न्यूजरुम हे कसे काम करते आहे, ते पुन्हा पुन्हा बघून आणि त्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या प्रेक्षकांना सेवा देता येते आहे का? आपल्याला काही नवीन वैशिष्ट्ये आपल्या उत्पादनामध्ये देता येतील का? काही नावीन्यपूर्ण गोष्टी आपल्याला करता येतील का? या सर्व गोष्टींचा विचार प्रत्येक माध्यमाने करणे आवश्यक आहे. प्रेक्षकांच्या आवडी-निवडी आणि गरजा कशाप्रकारे बदलत आहेत, यावर संशोधन करणे आवश्यक आहे आणि त्या संशोधनावर आधारित मजकुरामधील बदल हा माध्यमांना करावा लागेल. माध्यमांचे जे कर्मचारी आहेत, जे ग्राहक आहेत किंवा प्रेक्षक आहेत, त्यांच्याशी पारदर्शक होणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणे, हे प्रचंड आवश्यक आहे. त्यामुळे या काही गोष्टी माध्यमांना करता येतील आणि पुढे भविष्यात आपल्याला फक्त अल्पकालीन विचार न करता, दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी फायदेशीर अशा काही गोष्टी नक्कीच करता येतील, ज्या फक्त कोणत्या एखाद्या देशाच्या माध्यम उद्योगाला नाही, तर संपूर्ण जगातील माध्यम उद्योगाला हातभार लावतील, असे आपण नक्कीच म्हणू शकतो.