संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल
मुंबई : “तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चालले आहे पाहिले का? काय केले तुम्ही कोकणासाठी,” असा प्रश्नांचा भडिमार संतप्त चिपळूणकरांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंवर गुरुवार, दि. २९ जुलै रोजी केला.पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी पूरग्रस्त चिपळूण दौर्यावर पाहणीसाठी गेले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अनेकदा नैसर्गिक संकट आल्यानंतरही शासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने कोकणवासीयांनी संतप्त होत आदित्य ठाकरेंना धारेवर धरले.
“तुम्ही पर्यावरणमंत्री आहात. महिन्यातून किती वेळा तुम्ही कोकणात येतात? कोकणात काय चालले आहे, इथली परिस्थिती काय आहे, हे पाहायला तुम्ही येत नाही. आमचे किती नुकसान झाले आहे, याची माहिती आहे का? कोकणासाठी तुम्ही काय केले,” असा रोष स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी पूरग्रस्तांना पंचनामे पूर्ण होताच सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले.