भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन
मुंबई, दि. १६ : भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या ५० वर्षात अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे. यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते. त्यामुळे त्याचे नियोजन करणे त्यामानाने सोपे जाते. परंतू भूगर्भात असलेल्या भूजलाचे संशोधन करून नियोजन करण्याचे काम ही यंत्रणा करीत आहे. म्हणून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.भूजल संपत्ती वाढवण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे आणि या पुनर्भरणाचे विविध तंत्रज्ञान आणि उपाय योजना या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत व विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लोक सहभाग वाढविण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला जे जे सहकार्य लागेल ते शासनातर्फे करण्यात येईल. यंत्रणेतील जो कर्मचारी वर्ग अत्यावश्यक आहे, त्या पदांची प्राधान्यक्रमानुसार भरती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने अंतर्गत राज्यात १८३ प्रयोगशाळा पाणी तपासणी प्रयोगशाळा मंजूर आहेत. त्यामधून पाण्याचे नमुने तपासले जातात, गुणवत्तेबाबत काळजी घेण्यात येत आहे. बाटलीबंद पिण्याचे पाणी तपासणे गरजेचे असून ते योग्य आहे की नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुण्यातील नांदेड सिटी भागात पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहेत. त्याद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.अशा प्रकारच्या योजना राबविण्याची गरज आहे असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, शहरांमधील सांडपाणी हे प्रक्रिया न करता लगतच्या नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.जलपुनर्भरण, पाणी गुणवत्ता या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केंद्रीय योजनांची माहिती दिली. ते म्हणतात, आज राज्यात तीन मुख्य केंद्र पुरस्कृत योजना सुरु आहेत. त्या म्हणजे जलजीवन मिशन, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि अटल भूजल योजना. या तीनही योजनांच्या माध्यमातून राज्यातील पेयजल व्यवस्था व भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सक्षम करायचे आहे. त्याकरिता जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पाणी बचतीच्या (ठिबक/तुषार) उपाययोजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमात भूजल व सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व वैज्ञानिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील वरिष्ट भूवैज्ञानिक चंद्रकांत भोयर, पुणे, वरिष्ठ खोदन अभियंता मनोज सुरडकर, औरंगाबाद, डॉ. शैलेश कानडे, मुंबई, सहायक रसायनी, योगेश पाच्छापूरकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक, नाशिक, सुनिल महाजन, सहायक प्रशासन अधिकारी औरंगाबाद, शरद कुंजीर, उच्च श्रेणी लघुलेखक, पुणे, विजय पाटील, कनिष्ठ लिपीक, पुणे, व्ही. के. कनिरे,यांत्रिकी, जी. बी. शेख, वाहन चालक, पुणे ,जे. ए. कोतवाल, पहारेकरी,पुणे यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी भूजल विभागाची वाटचाल, भूजल विशेषांक, तांत्रिक मार्गदर्शिका, पाऊस पाणी संकलन व भूजल पुनर्भरण या पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.