मुंबई : देशातील सर्वात मोठी महानगरपालिका निवडणूक घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोना निर्बंध आणि नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत निवडणुकांची तयारी करावी असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २०१७मधील लोकसंख्येच्या अंदाजानुसार प्रभाग विभाजनाचे कार्य हाती घ्यावे अशा सूचना केल्या आहेत. यात जवळपास २२७ मतदारसंघ येतात. त्यापैकी सध्या शिवसेनेचे ९७ आणि ८३ भाजप तसेच ३० काँग्रेसचे आहेत. वॉर्डांचे सीमांकन केल्यामुळे नवीन जनगणनेचा डेटा विचारात घेतला जाऊ शकतो. २०११ च्या जनगणनेनंतरचा कोणताही नवीन डेटा उपलब्ध नाही. राज्य निवडणूक आयोगाने बीएमसीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदारांच्या आधारे नवीन मतदार याद्यासुद्धा तयार करण्यास सांगितले आहे. तसेच फेब्रुवारी २०२२ च्या वेळापत्रकानुसार महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यास सांगण्यात आलेले आहे. २०११ ची जनगणना आणि कोणताही नवीन जनगणनाचा डेटा उपलब्ध नाही, तर दुरुस्तीची प्रक्रिया होऊ शकते, ”असे राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदन यांनी सांगितले.
मदन म्हणाले की, कोविड-१९ प्रोटोकॉल निवडणुकीच्या तयारी दरम्यान पाळले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला ७ हजार ९०० बुथ आहेत. परंतु एकाच बुथवर गर्दी होऊ नये म्हणून आता बुथची संख्या वाढवावी लागणार आहे. आता तब्बल ही संख्या महापालिकेला ११ हजार ५०० पर्यंत वाढवावी लागणार आहे. प्रत्येक बूथमध्ये फक्त १४०० ते १५०० मतदार मतदान करू शकतील.