पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. या निवडणुकात राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी २ मे रोजी जाहीर होत आहेत. या निवडणुकीत आता भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. मात्र आता भाजपच्या विजयाबरोबरच राष्ट्रवादीच्या पराभवानंतर आता पार्थ पवारांना तिकीट नाकारणं राष्ट्रवादीला महागात पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर आपलं कायम वर्चस्व ठेवल. भारत भालके यांनी सलग १८ वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती. मात्र २७ नोव्हेंबरला मध्यरात्री त्यांचे निधन झाले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत भालके यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना परत घरी पाठवण्यात आलं. मात्र पुढे काही दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. ज्यात राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली.
भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी अशी शरद पवारांची इच्छा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकोली येथे येऊन भालके कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांकडून भारत भालके यांचे पुत्र भगिरथ यांची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी झाली होती. मात्र त्यावर पवारांनी भाष्य केले नव्हते. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना या जागेवर उमेदवारी द्यावी ही मागणी केली होती.अमरजित पाटील यांनी शरद पवार यांना तसं पत्रदेखील लिहिलं होतं. यावेळी पाटील यांनी पत्रात लिहिलंय की पंढरपूर मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं. पार्थ पवार पंढरपूरमध्ये आले तर रखडलेला विकास लवकर होईल, त्यामुळे पार्थ यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
तरुणांचा विरोध ही चर्चा मात्र विरोध नेमका कोणाचा ?
पार्थ पवार हे पंढरपूर येथून निवडणूक लढवणार या वृत्ताचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंडन केलंय तर उमेदवारीचा निर्णय अजून झाला नसल्याचं सांगितलं. मात्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत तरुणाईचा विरोध असल्याचं बोललं जातंय. मात्र नेमका विरोध कोणाचा ? हे समजून घेतलं पाहिजे. तत्पूर्वी पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी २०१९ला मावळ मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पार्थ यांच्या बाजूने पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद आहे. मात्र २०१९च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय होताना दिसले नाहीत.
पार्थ पवारांची पक्षविरोधी भूमिका कायमच चर्चेचा विषय
मात्र दरम्यानच काळात पार्थ पवार यांची पक्षविरोधी भूमिका कायमच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब, अजितदादा निर्णय घेतील असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. लोक बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. कोणी अशी मागणी केली, म्हटलं म्हणून लगेच ती मागणी पूर्ण होईलच असं होत नाही, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.तर पार्थ पवार हे पंढरपूर येथून निवडणूक लढवणार आहेत, अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. याविषयी चर्चा वाढताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या वृत्ताचे खंडन केलं होतं.
राष्ट्रवादीच्या गोट्यातून कायमच पार्थ पवारांबाबत नाराजीचा सूर
खरंतर पार्थ पवारांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ही उत्तम संधी राष्ट्रवादीला होती मात्र पार्थ पवारांबाबत राष्ट्रवादीच्या गोट्यातून कायमच नाराजीचा सुरु दिसून येतो. पार्थ पवार यांना लोकसभा निवडणुकांच्या वेळी मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून शरद पवार यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याबाबत सोशलमिडीयावर लिहिल होतं. जे अजित पवार भर विधानसभेत विरोधी पक्षातील नेत्यांना मला पराभूत करून दाखवा असे चॅलेंज देतात तेच अजित पवार मुलगा पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर मौन बाळगताना दिसतात. पार्थ पवार यांच्या भूमिका आजोबा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत धोरणाला छेद देणाऱ्या असतात. शरद पवारांनी नातू रोहित पवार यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी पूर्ण ताकद लावली मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांना राष्ट्रीय व राज्यातील राजकारणापासून कायमच दूर ठेवले. केवळ खुलेपणाने हिंदुत्वाला पाठिंबा देत 'जय श्रीराम'चा नारा देणे, सुशांतसिंग राजपुत प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी करणे व भाजपच्या विकासपूरक निर्णयांना पाठिंबा देणं हाच पार्थ पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय कारकिर्द घडविण्यातला अडथळा तर ठरत नाहीत ना ? हेच कारण आजच्या राष्ट्रवादीच्या पराभवास देखील कारणीभूत ठरले का याची मीमांसा होणं गरजेचं आहे.