
माजी खासदार निलेश राणे यांची संतप्त भावना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात झालेले लॉकडाऊन आणि तिथल्या लोकांचा प्रतिसाद पाहता जर ठाकरे सरकारने संपूर्ण राज्यात लॉक डाऊन जाहीर केले तर लोक मंत्रालयात घुसून मंत्र्यांना चोपतील अशा तिखट शब्दांत भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी लोकांच्या संतप्त भावनांना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यात लॉक डाऊन जाहीर करावे लागेल असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले होते. मात्र आता लोकांना लॉक डाऊन नकोय. राज्यातील ज्या जिल्ह्यात लॉक डाऊन झाले तिथंल्या नागरिकांना अनेक संकटाना सामोर जावं लागलं. तसेच जिल्ह्यात वारंवार लॉकडाऊन होत असल्याने लॉकडाऊनला कंटाळून परभणी जिल्ह्यात व्यापाऱ्याची आत्महत्या देखील झाली आहे. या प्रकरणावरून भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, काही मदत न मिळता फक्त लॉकडाऊन होत राहील जनतेमध्ये असंतोष निर्माण होईल.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मोठ्या प्रमाणात मृत्यू देखील होत आहे. राज्यातील रुग्णालयात बेड, ऑक्सिजन यांची कमतरता आहेत. रुग्णांना आरोग्य सोयी-सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू देखील झाले आहेत. याला जबाबदार मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच आहेत. मुख्यमंत्री जनतेच्या समस्या कधी जाणून घेणार? असा प्रश्न देखील जनतेकडून उपस्थित होत आहे. लॉक डाऊनमुळे लोक आत्महत्या करू लागलेत. ह्याला जबाबदार ठाकरे सरकार नाही तर कोण?? दीड वर्षात जर महाराष्ट्रात दर्जेदार आरोग्य सेवा उभी राहू शकत नाही तर सामान्य लोकांनी ह्या फालतू सरकारचं का ऐकावं?असा सवाल देखील राणे यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.