मुंबई : 'आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, अशी विनंती मुख्यमंत्री वारंवार करत आहेत. परंतु कोणीही हे ऐकत नाही. अशीच स्थिती राहिली तर जे नियम रात्रीचे आहेत ते नियम सकाळी देखील लावावी लागतील,' असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
'लोकांना लॉकडाऊन नको आहे, पण स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळत सर्व काही करायचे आहे. लोकांनी नियम पाळले नाहीत तर त्यांचा जीव धोक्यात येत आहे, हे देखील समजून घ्यायला हवे. सकाळी किराणा दुकान रेल्वे इत्यादी ठिकाणी काय व्यवस्था करायची याचे नियोजन सध्या सुरू आहे. कारण या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. त्यात जर कुणाला लागण झाली तर रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे,' अशी भीतीही अस्लम शेख यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत पुन्हा एकदा जम्बो कोव्हिड सेंटर सुरू होणार
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने परत एकदा मुंबई शहर आणि उपनगरातील मोठे उपचार केंद्र सुरु करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक दिवशी तीस हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्यात अडीच लाखापेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण असून गृह विलगीकरणात सर्वाधिक रुग्ण आहेत. तर दुसरीकडे लक्षणे गंभीर स्वरूपात असलेले रुग्ण शासनाच्या वेगवेगळ्या रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राज्यातील नागपूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अशा ठिकाणी बेड कमी पडत असल्याच्या तक्रारी सुद्धा रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईत देखील दररोज तीन हजाराच्या वर रुग्ण संख्या आढळत आहे. कुठे ना कुठे पुढच्या कालावधीमध्ये अशीच रुग्ण संख्या वाढत राहिली तर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेत मुंबईत पुन्हा एकदा जम्बो उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री यांनी दिली आहे.