हिरेन हत्या प्रकरणाचा संबंध श्रीराम मंदिराशी जोडण्याचा बालिश खेळ
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या नागपूरच्या कंपनीत बनविलेल्या होत्या. त्या कंपनीच्या व्यक्तीने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ५० कोटी रूपयांची देगणी दिली आहे. त्यामुळे जिलेटिनच्या कांड्या कोणी पुरविल्या याचा सखोल तपास व्हावा, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत गुरुवारी केले.
केतकर म्हणाले, उद्योगपती अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन स्फोटकांनी भरलेले वाहन आढळले. नंतर त्या वाहन मालकाचाही मृतदेह आढळला, सदर प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. मात्र, त्यात सापडलेल्या जिलेटिन कांड्यांचा उत्पादक, पुरवठादार अथवा वितरक कोण, याची चौकशी झाली नाही. जिलेटिनच्या कांड्या या नागपूरच्या कंपनीत बनविलेल्या होत्या आणि त्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी १५ कोटी रूपयांची देणगी दिली होती. त्यामुळे या नागपूर कनेक्शनची चौकशी व्हावी, अशी मागणी केतकर यांनी केली.
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर हे नेहमीच हिंदूंच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थानांची खिल्ली उडवित असतात. मात्र, ते करताना आता ते बरळू लागले आहे. राज्यसभेत त्यांनी सध्या पवार पुरस्कृत ठाकरे सरकारची झोप उडविणाऱ्या मनसुख हिरेन, सचिन वाझे प्रकरणाविषयी एक वक्तव्य केले. मात्र, सदर वक्तव्य हे कामकाजातून काढून टाकले जाईल, अशी तंबी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिली.