भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतला महाविकास आघाडीचा समाचार
पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड याच्याविरोधात तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. बुधवारी त्यांनी या प्रकरणाच्या घटनास्थळी भेट दिली त्यावेळेस त्यांनी पुणे पोलीस, राज्य सरकार, महाविकास आघाडीसह संजय राठोड यांच्यावर आसूड ओढले.
चित्रा वाघ म्हणाल्या, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातील एक चारित्र्यवान नेते, अशी ओळख आहे. त्यामुळे त्यांनी खुन-बलात्काराचे आरोप असलेली घाण मंत्रीमंडळात ठेवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांनी त्यांचे विचारही आचरणात आणावेत. राठोडविरोधात कारवाई करता येत नसेल तर मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास सक्षम आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा."
पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुणे पोलीसांना चित्रा वाघ यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या प्रकरणात पहिल्यांदा क्रमांक १०० वर जो फोन गेला होता. त्यावेळी सविस्तर माहिती घटनास्थळीच्या लोकांनी दिली होती. दुसऱ्यांदा पुन्हा फोन करून पूजाच्या मृत्यूचे सविस्तर माहिती दिली होती. तरीही अद्याप एफआयआर दाखल का करण्यात आलेली नाही. पोलीसांनी इतक्या ऑडिओ क्लिप पुढे असताना, फोटो असताना मीडिया ट्रायल का सुरू ठेवली, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी पुणे पोलीसांना विचारला आहे. अरुण राठोडचा सीडीआर रेकॉर्ड का तपासला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
तातडीने एफआयआर दाखल करून संजय राठोड यांची चौकशी करावी, नंतरच पूजाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल तयार करावा, आम्ही पोलीसांनी सादर केलेला जूना अहवाल मानत नाही, असेही त्या म्हणाल्या. पोलीसांनी सेवेत रुजू होण्यापूर्वी जी शपथ घेतली त्या शपथेला त्यांनी जागावे, असा टोला त्यांनी लगावला. "आम्हाला आदेश नाही, सबळ पुरावे नाहीत," अशी उत्तरे दिल्यानंतर चित्रा वाघ आणि पोलीसांमध्ये बाचाबाचीही झाली होती. पोलीसांना कुणाचा लेखी आदेश हवा आहे, असा प्रश्न त्यांनी पोलीसांना विचारला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धुळ फेकणं बंद करा!
महाराष्ट्राच्या इतिहासात इतके अकार्यक्षम अधिकारी आम्ही पाहिले नाहीत. महिलांच्या विषयांबद्दल तीन तीन सामुहिक बलात्कार होत असताना पोलीस शांत कसे बसू शकतात. बलात्काऱ्यांना पाठीशी घालून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांच्या अस्मिता आणि संरक्षणाबद्दल पोलीस महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी नाहीत का, असा प्रश्न त्यांनी पोलीसांना विचारला आहे.
चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राठोड यांनी लाख काय दहा लाख लोकांच्या उपस्थितीत जरी शक्ती प्रदर्शन केले तरीही ते निर्दोष सुटू शकत नाहीत. संजय राठोड हत्यारा आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
"राज्याला महिला आयोग नाही"
राज्य सरकार सत्तेत येऊन वर्ष उलटून गेले तरीही राज्य सरकारला महिला आयोग अध्यक्ष नेमता आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने पूजा चव्हाण प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांवर बलात्कारासारखे गुन्हे होत आहेत आणि राज्य सरकार बलात्काऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, या प्रकाराची मला किव वाटत आहे, असेही त्या म्हणाल्या.
"बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी हम साथ है!"
संजय राठोडला वाचवण्यासाठी आता राज्यातील नेतेमंडळींमध्ये चढाओढ सुरू आहे. राठोड निर्दोष असल्याचा गप्पा नेते मंडळी मारत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'मी जबाबदार' ही घोषणा केली आणि त्यांचे मंत्री बेफिकीरपणे शक्तीप्रदर्शन करत फिरत आहेत. अनेक दिवसांनंतरही स्पष्टीकरण येत नाही. पोलीस राठोड यांचे नाव ऐकून कान बंद करून घेत आहेत, असा आरोपही त्यांनी केल्या.
१३ ऑडिओ क्लिप्स आणि लॅपटोप फोटो
पूजा चव्हाण प्रकरणात १३ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत. पूजाशी संवाद साधणारी ती व्यक्ती दुसरा तिसरा कुणीही नसून संजय राठोडच आहे, असा थेट आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पोलीसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे त्या म्हणाल्या.
पूजाचे कुटूंबिय राठोडांच्या नजरकैद
पूजा चव्हाणच्या कुटूंबियांचा आवाज दाबण्यासाठी राठोडने त्याची माणसे पहाऱ्यासाठी ठेवली आहेत. त्यांच्यापर्यंत कुणीही पोहोचू नये, याची खबरदारी राठोडची माणसे घेत आहेत, असा खळबळजनक आरोप वाघ यांनी केला आहे. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी कुटूंबीयांच्या संपर्कात आहेत. मात्र, कुटूंबीयांनी कुठलीही गोष्ट सांगण्यास नकार दिला आहे. त्याच्यावर दबाव असल्याचा दावा वाघ यांनी केला आहे.
शक्ती कायद्यातून मंत्र्यांना सवलत
महिला अत्याचार विरोधी २१ दिवसांत फाशी हा शक्ती कायदा राज्यातील मंत्र्यांना वाचवण्यासाठी पारित करण्यात आला आहे का?, मंत्र्यांचे नाव अत्याचाराच्या घटनांमध्ये दिसून आले कि त्याला विशेष सवलत दिली जाणार आहे का, असा प्रश्न वाघ यांनी विचारला आहे.