मुंबई : मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्यापासून (सोमवार) सुरू होणार नाहीत, असे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत फेरविचार होणार आहे. त्यानंतरच महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय होणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. मुंबईतील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोमवारपासून राज्याप्रमाणे मुंबईतील महाविद्यालयेही सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र तूर्तास या निर्णयाला ब्रेक देण्यात आल्याचे कळते.मुंबई विद्यापीठाने पत्रक काढत संबंधित महाविद्यालयांना याबाबत कळवले आहे.
मुंबईतील लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू केल्यानंतर मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याचा आढावा घेऊन रुग्णसंख्या कमी असल्यास चर्चा करून मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. २२ फेब्रुवारीआधी निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेने मुंबई विद्यापीठाला कळवले आहे. राज्यात सोमवारपासून महाविद्यालये सुरू होत असली तरी मुंबई महानगर प्रदेशात महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे.