विमानतळ झालं! लोकांनी घरी जाताना खड्ड्यातून जायचं का? : राणेंचा सवाल

राणेंच्या फटकेदार भाषणाने विमानतळ उद्घाटन कार्यक्रम "हायजॅक"

    09-Oct-2021
Total Views | 327

Rane _1  H x W:
 
 
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा हा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकाच मंचावरील उपस्थितीमुळे चांगलाच चर्चेत आला. अपेक्षेप्रमाणे राणेंनी जोरदार प्रहार करत कोकणाच्या विकासकामांबद्दल सरकारला प्रश्न विचारले. विमानतळ झाले पण इथल्या रस्त्यांचे काय?, पायाभूत सुविधांचे काय?, असा रोखठोक प्रश्न विचारत त्यांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
 
 
 
प्रोटोकॉल प्रमाणे भाषणे झाली. उद्धव ठाकरेंच्या पूर्वीच नारायण राणेंचे भाषण झाले. राणेंनी आपल्या खास शैलीत शिवसेनेचा समाचार घेतला. 'मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले. कोकणी माणसाला त्यांनी काहीच दिलं नाही,' अशी टीका नारायण राणे यांनी केली.
 
 
 
 
"भांडाफोड काय करायचा, ज्यांनी विमानतळाला विरोध केला तेच आज इथे मंचावर उपस्थित आहेत," असे म्हणत नाव न घेत त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, "उद्धवजी, तुम्हाला सर्व माहिती मिळते. तुम्हाला ब्रीफ होतं. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात याची माहिती घ्या. तुम्हाला सत्य कळेल, असं सांगतानाच बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला
नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू," असेही ते म्हणाले.
 
 
 
राणेंच्या मुद्द्याला उत्तर द्यायला मुख्यमंत्र्यांना विसर
 
 
मुख्यमंत्र्यांनी माझ्या कोणत्याही मुद्द्याला उत्तर दिलेलं नाही. त्यांचं एक तरी वाक्य पूर्ण होतं का? पूरपरिस्थिती, वादळाची थकबाकी बाकी आहे. त्यातील एक रुपया तरी त्यांनी दिला का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. विनायक राऊतांनी त्यावेळी विरोध केला. हे मी त्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला मी भाषण मानत नाही. त्यात काही मुद्देच नव्हते. त्यांना आज लिंक लागली नाही, अशी टीकाही त्यांनीही केले.
 
 
 
मुख्यमंत्र्यांकडे तिळगुळ कुठे होता?
 
 
राऊतांनी मला पेढा दिला. त्यावर मी त्यांना बोललो. नुसतं गोड वाटून गोड होत नाही सगळं. आतमध्ये लागतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी तिळगुळ घ्या म्हटलं. पण त्यांच्याकडे तिळगुळ कुठे होता? त्यांनी कधी कुणाला तिळगुळ दिला का? काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
 
 

राणेंनी सूचवला कोकणी मेन्यू
 
 
चिपीहून सुटणाऱ्या विमानात काय द्यावं हे मी सांगितलं आहे. कोकम सरबत, नारळाची वडी, कोकणी घावणे देण्याची सूचना केली आहे, असं ते म्हणाले. सर्वांचा विमान प्रवास सुखमय होता. विमानात शिवसेनेच्या खासदारांशी बोलणं झालं. सर्व बोलले मला. माझं काही कुणाशी वैर नाही, असंही त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंना मी टॅक्स फ्रि जाहीर केलं. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांना काय सल्ला देणार? मी त्यांना सूचना केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
 
 
मान्यवरांची उपस्थिती
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्री उपस्थित होते. तर, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खासदार विनायक राऊत यांनी केले. 



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121