मुंबई : केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तक्रार केली आहे. "मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे. यामुळे माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत." अशी तक्रार समीर वानखेडे यांनी केली आहे. त्यांनी नागरी सेवा उत्तीर्ण होताना दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात असल्याचेदेखील त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.
दुसरीकडे, समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यांनी सांगितले की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहे. यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यांनी आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे.
"माझ्यावर नवाब मलिक यांनी अनेक खोटे आरोप केले आहेत. माझ्या भावाच्या प्रामाणिक कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी नवाब मलिक माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. नवाब मलिक माझ्या सोशल मीडिया हँडलवरून बेकायदेशीरपणे फोटो काढत आहेत " असे यास्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.