देगलूर-बिलोलीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणावीसांची राज्य सरकारवर जोरदार टीका
नांदेड: देगलूर-बिलोली पोटनिवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचारसभा झाली.यावेळी केंद्रिय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनीही जनतेसमोर भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत मंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप खा. प्रताप पाटील चिखलीकर,आमदार बबनराव लोणीकर, आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे- चिखलीकर आणि भाजपतील ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारच्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर देण्यास सुरुवात केली. जातपात,धर्म पहिला नाही मात्र गेल्या २ वर्षात या सरकारने एकही गरिबाला घर दिले नाही. राज्यातील सरकारची 2 वर्षांतील उपलब्धी काय? जलयुक्त शिवार बंद,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद,नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना बंद,स्मार्ट योजना बंद,ड्रीप इरिगेशन बंद, रस्त्यांची कामे बंद, धरणांची कामे बंद,शेतकर्यांचा विमा,वीज बंद, शेतकर्यांना मदत बंद, राज्यात केवळ बंद सरकार आहे. महाराष्ट्रातील जनताच यांना धडा शिकवेल. मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू असा कार्यक्रम सरकारचा सुरू आहे, असा जोरदार टोला फडणवीसांनी महाविकास आघाडीला लगावला.
पुढे महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले, छापे पडले यात जो भ्रष्टाचार उघड झाला तो धक्कादायक आहे. आणि हे फक्त पैसे खात नाहीत तर प्रत्येक पैशाचा हिशोब यांनी ठेवला आहे. हे महाविकास आघाडी सरकार sofisticated भ्रष्टाचार, आधुनिक भ्रष्टाचार करत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
पुढे शेतकऱ्यांच्या मुद्यावरून टीका करताना ते म्हणाले, केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्याकडे आम्ही पीक विम्यासंदर्भात विचारणा केली. शेतकऱ्यांना पीक विमा कसा देता येणार हे विचारले असता त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. केंद्र सरकारने पीक विम्याचा हप्ता भरला आहे मात्र राज्य सरकारने एकही हप्ता दिलेला नाही, असा आरोप फडणवीसांनी केला. याचबरोबर १२ बलुतेदार, छोटे व्यावसायिक यांना एकही रुपया या सरकारने दिला नसल्याची आणि हे सरकार धनदांडग्याचं आणि भ्रष्टाचार्यांचे सरकार असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली. तर जनविरोधी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आहे.मराठा, ओबीसी अशी सगळी आरक्षणं यांनी घालविली!
मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बंद केले. पण, मराठवाड्यातील एकही मंत्री बोलला नाही. हा साधा विषय नाही. पुढच्या अनेक पिढ्यांच्या तोंडचा विकास पळवून नेण्याचा हा प्रकार आहे. शेतकर्यांना फुटकी कौडी नाही आणि नेत्यांच्या घरात पॅकेज जात आहेत,अशी टीकाही त्यांनी केली.