मुंबई : ‘पहले मंदिर फिर सरकार’ म्हणणारे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना मंदिरात जाऊ देत नाहीत, अशी खोचक टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. भाजप आणि वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले आहेत.
कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत 'महाराष्ट्रातीलच मंदिरे बंद का? तसेच सगळ्यात शेवटी मंदिरं उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये' असे म्हणत राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर आज “पहले मंदिर फिर सरकार, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत, याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामित्व सिद्ध करण्याची चढाओढ?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर विचारला आहे.
“सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये, त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. “लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. भाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. याआधी जिम व्यावसायिक आणि वाढीव वीज बिलासाठी मनसेने आंदोलन छेडले आहे.