पंढरपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले पंढरपुरातील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी वारकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे खुले करावेत. सोशल डिस्टंसिंगचे निर्बंध पाळूनच इथे पूजाअर्चा करण्यात यावी, तसेच भाविकांना दर्शनासाठीवेळीही हे निर्बंध पाळले जातील या दृष्टीने नियमावली घालून मगच परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने वारकऱ्यांकडून केली जात आहे. भाजपने शनिवारी राज्यभरात या पार्श्वभूमीवर घंटानाद आंदोलन केले होते.
दारूची दुकाने खुली झाली मग मंदिरे बंद का ?, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. नव्या लॉकडाऊन धोरणांमध्ये मंदिरांबद्दल विचार करावा आणि मंदिरे खुली व्हावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहेत. दरम्यान, या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत.