एकेकाळी मुंबईत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या नावाखाली अशाच दहशतवादी, कट्टर इस्लामिक विचारसरणीला खतपाणी घालणारा झाकीर नाईक. स्वत:ला इस्लामचा सर्वात मोठा अभ्यासक म्हणवून घेणारा नाईक 2016 साली भारतातून पळून मलेशियात दाखल झाला.
“जर ओसामा बिन लादेन इस्लामच्या शत्रूविरोधात लढत असेल, तर मी त्याच्या सोबत आहे. जर तो अमेरिकेत दहशत माजवतोय, तर या जगातील सर्वात मोठी दहशतवादी असलेल्या अमेरिकेविरोधातील लढाईत मी लादेन बरोबर आहे.” हे जहरी विचार आहेत झाकीर नाईकचे. एकेकाळी मुंबईत ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या नावाखाली अशाच दहशतवादी, कट्टर इस्लामिक विचारसरणीला खतपाणी घालणारा झाकीर नाईक. स्वत:ला इस्लामचा सर्वात मोठा अभ्यासक म्हणवून घेणारा नाईक 2016 साली भारतातून पळून मलेशियात दाखल झाला. कारण, बांगलादेशातील ढाक्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरेही नाईकपर्यंत पोहोचले. तेव्हा, भारतात अटकेच्या भीतीने त्याने मलेशिया गाठले. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला कारण ब्रिटनने त्याच्या विषारी विचार फुत्कारणार्या ‘पीस टीव्ही’वर केलेली जवळपास तीन लाख पौंड्सची दंडात्मक कारवाई. कारण, या वाहिनीवर नाईकने मांडलेले विखारी विचार हे साहजिकच ब्रिटनच्या माध्यम कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
पण, म्हणा या सगळ्याने झाकीर नाईकच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण, मलेशियाकडे नाईकच्या प्रत्यार्पणाची भारताने वेळोवेळी मागणी करुनही तेथील सरकारने याबाबत सकारात्मक पावले उचललेली नाहीत, हे खेदाने नमूद करावे लागेल. म्हणूनच भारताने शेवटी ‘इंटरपोल’कडे नाईक विरोधात ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची मागणीही लावून धरली आहे. पण, फक्त भारतच नाही तर आशिया खंडातले इतर देशही झाकीर नाईकच्या या विषवाणीने तितकेच चिंतीत आहेत. 2016चा ढाका स्फोट असो, श्रीलंकेतील जीवघेणे बॉम्बस्फोट असो वा भारतातील केरळच्या मुसलमानांचे ‘इसिस’शी उघड झालेले लागेबांधे, या सगळ्यांचे धागेदोरे हे झाकीर नाईक आणि त्याच्या ‘पीस टिव्ही’शी जोडले आहेत. नावाला ही वाहिनी ‘पीस’ म्हणजे शांततेचा प्रचार-प्रसार करणारी वाटत असली तरी या वाहिनीवरील कार्यक्रम आणि नाईकची भाषणं ही फक्त जिहादी वृत्तीला खतपाणी घालणारी असतात. तेव्हा, फक्त कोणा एका देशाने दंड ठोठावून किंवा या वाहिन्यांचे प्रसारण थांबवून झाकीर नाईकचे नापाक मनसुबे मुळापासून उखडता येणार नाहीत. त्यासाठी गरज आहे, सर्व देशांनी वेळीच ही विषवल्ली ओळखून तिला ठेचण्याची. ‘पीस टीव्ही’ची पिसे काढण्याची. पण, त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यही तितकेच अपेक्षित आहे.
मलेशियासारख्या मुसलमानबहुल देशाने मात्र झाकीरला पंखाखाली घेतले. पण, आता तिथेही त्याने मलेशियन हिंदू आणि मुसलमानांमध्ये वितुष्ट आणण्याचा, धार्मिक दंगे भडकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सलग दहा तास झाकीरची पोलीस चौकशीही झाली. त्याला मलेशियातून बाहेर फेकण्याची मागणीही तेथील काही राजकारण्यांनी केली. पण, मलेशियन सरकारने मात्र झाकीरला भारताच्या ताब्यात देण्यास टोलवाटोलवीच केली. कदाचित, मलेशियातून ‘इसिस’ची काळी बीजे अंकुरु लागल्यावर या देशाला आपण कोणत्या राक्षसाला आपल्या जमिनीवर पोसतोय, याची कल्पना यावी. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. कारण, झाकीरच्या निशाण्यावर असतात तरुण मुसलमान मुलं, शिक्षित आणि अशिक्षितही. शिक्षित मुसलमान तरुणांना झाकीरचे फाडफाड इंग्रजीतील इस्लामविषयक विचार आणि इतर धर्मांचा संशोधनपूर्ण अभ्यास वगैरे गोष्टी भुरळ पाडतात, तर अशिक्षितांनाही झाकीरचा उर्दू, बांगला भाषेतील इस्लाम अभ्यास चकीत करुन जातो. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबईसारख्या देशातून प्रसारित होणार्या ‘पीस टीव्ही’ला आर्थिक पाठबळही तितकेच भक्कम आहे.
सौदी अरेबिया आणि इतर आखाती मुस्लीम देशांकडून धर्मप्रसाराच्या नावाखाली अब्जावधी उकळून झाकीरने तो पैसा जिहादी कारवायांमध्ये वर्ग केला. मनी लॉण्डरिंग, टेरर फंडिंगच्या आरोपांखालीही नाईक ‘मोस्ट वॉण्टेड’ आहेच. शिवाय, ‘अल कायदा’, ‘इसिस’बरोबर झाकीरचे संबंधही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे खरं तर इस्लामिक देशांनीही झाकीरची सर्वोेपरी रसद तोडायली हवी, ज्याची शक्यता या देशांचा एकूणच पवित्र लक्षात घेता, तशी धुसरच म्हणावी लागेल. म्हणूनच भारताने देशाच्या सुरक्षिततेसाठी मलेशियावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करुन लवकरात लवकर झाकीरसारख्या मोकाट जिहाद्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात.