नवी दिल्ली : देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ हजार २६० इतकी झाली आहे. रविवारी दिल्लीत ४२२, ओदीशामध्ये ९१, राजस्थानात ७०, आंध्रप्रदेशात २५ आसाममध्ये तीन रुग्ण आढळले होते. देशात ३१ जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ७४ दिवसांनी कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांतच १० हजार नवे रुग्ण आढळण्याचा विक्रम तयार झाला आहे. १६ मे रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने ९० हजारांचा पल्ला ओलांडला.
शनिवारी सर्वात जास्त ४ हजार ७९२ रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा आकडा ३० हजारांच्या पार गेला आहे. गुजरात आणि तमिळनाडूमध्ये १० हजारांवर रुग्ण पोहोचले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात एकूण ९० हजार ९२२ रुग्ण आढळले आहेत. ५३ हजार ९४६ रुग्णांवर अद्याप इलाज सुरू आहे. तर ३४ हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अद्याप २ हजार ८७२ रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे.