संत अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरीस्वामींचा मुख्यमंत्र्यांना इशारा
वाराणसी : महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्येबद्दल काशीच्या संत समुदायाकडून अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. साधू हत्या प्रकरणात सर्व दोषींना लवकर शिक्षा न दिल्यास संत समाज आणि नागा साधू लॉकडाऊननंतर धडक आंदोलन करतील असा इशारा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
या संदर्भात शुक्रवारी पातालपुरी पीठाचे महंत बाळकदास यांनी काशी, प्रयाग अयोध्या आणि मथुरा येथील संतांसोबत ऑनलाइन चर्चा केली. अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी या यांच्या निर्णयाचे सर्व संतांनी समर्थन केले. ३ मेनंतर म्हणजेच लॉकडाऊननंतर या संदर्भात कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे संत म्हणाले. जोपर्यंत साधूंच्या हत्येच्या दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याची मागणी संतांतर्फे केंद्र सरकारला केली जाणार आहे.
भैदानी येथील प्राचीन शिव हनुमान मंदिराचे महंत आणि वैष्णव संत संस्थेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. श्रावणदास म्हणाले की, ‘अगस्त्य मुनिंचे मंदिर असलेल्या पालघरमध्ये साधूंची हत्या होणे यामागे कारस्थान असल्याचे दिसते.’ या संदर्भात, ते अखिल भारतीय साधू समाज, आखाडा परिषद आणि काशीतील संत आणि महंतांशी देखील चर्चा करीत आहेत. लॉकडाऊननंतर संत समुदायाने रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.