संस्कृतच्या प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचत अख्ख्या भारतभर भ्रमंती करणारे वेदशास्त्रसंपन्न रामेश्वर शास्त्री उपाख्य तात्या कर्वे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा करणारा हा लेख...
सुमारे २० वर्षांपूर्वी ची गोष्ट असावी. संघाच्या प्रवासासाठी मी पारनेर येथे गेलो होतो. माझा मुक्काम तालुका कार्यवाह डॉ. पुरकर यांच्याकडे होता. रात्री जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसलो असताना पलीकडे संस्कृत पठणाचा आवाज येत होता. मित्रवर्य किशोर पुरकर यांच्या पत्नी कुणाकडून तरी रुद्र म्हणण्याची संथा घेत होत्या. संथा देणारे गृहस्थ हे आवाजावरून थोडे वयोवृद्ध वाटत होते. थोड्या वेळाने ते बाहेर आले आणि डॉ. पुरकर माझा परिचय करून द्यायला लागले. अर्ध्या बाहीचा शर्ट, अर्धी हाफ पॅन्ट आणि डोक्यावर टोपी. प्रसन्न चेहरा. किंचित वाढलेली दाढी. बेताची उंची आणि प्रकृती मात्र चांगली असे ते व्यक्तिमत्त्व.
डॉक्टरांनी माझी ओळख करून दिली आणि त्यांचा परिचय करून दिला हे तात्या कर्वे. कोकणात असतात.येथे नेहमी पारनेरकर महाराज यांच्याकडे येत असतात आणि संस्कृत प्रसारासाठी कार्य करतात. मी आदराने नमस्कार केला आणि त्यांनी प्रश्न विचारला, “मुळे म्हणजे कुठले ?” मी “नगर” असे उत्तर दिल्यावर पुढे विचारायला लागले, “माळीवाडा की भिंगार?” मला आश्चर्य वाटले. माझी ती मुद्रा बघून ते म्हणाले, “अरे मी नगरचाच! माझे शिक्षण संस्कृतचे नगरला झाले आणि हे जे काही थोडे फार संस्कृत प्रसाराचे काम करतो ना त्याची मला प्रेरणा माझ्या गुरूंचीच! तेही मुळेच होते.”
मी थोडी माझी माहिती सांगायला सुरुवात केली. माझे आजोबा आणि काका हे पण संस्कृत शिकवायचे. आजोबा वेदशास्त्रसंपन्न आणि काका काव्यतीर्थ होते. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ते विचारते झाले, “अरे महादेवशास्त्री यांचा नातू तर नाही ना तू?” मी पण या योगायोगाने एकदम चकित झालो होतो.मी म्हणालो “हो!” हे ऐकले आणि त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि सद्गदित होऊन म्हणाले, “अरे माझ्या गुरूंचा तू नातू की रे!”
हा सगळा प्रसंग आता समोर उभा राहिला तो तात्या कर्वे यांची बातमी ऐकल्यावर. 102 वर्ष पूर्ण करून त्यांनी आपला देह ठेवला.त्यांचे जर वर्णन करायचे म्हटले तर एकाच वाक्यात करावे लागेल ते म्हणजे ‘ध्येयाने झपाटलेला’ संस्कृतचा प्रसार आणि प्रचार हेच त्यांचे ध्येय होते आणि ते पण क्षेत्र त्यांनी निवडले होते ते कोकण परिसर. अलिबाग, खोपोली या परिसरात राहणार्या वनवासी आणिबहुजन समाजातल्या सर्वांना पौरोहित्य शिकवण्याचे ते काम करत होते. विशेष म्हणजे, महिलांनी पौरोहित्य करावे, यासाठी संस्कृत शिकावे ही त्यांची तळमळ होती. यासाठी पायपीट करत, सायकलवर जात, जसे जमेल तसे एसटीने ते प्रवास करत होते. कोकणातील माणसाकडे असणारा जो एक चिकाटी आणि काटकसरी राहणीमानाचा गुण त्यांच्याकडे जन्मतः होता.
त्यांच्या कार्याचा परिचय त्या दिवशी मी करून घेत असताना त्यांनी नगरच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. नगरला ते पोहोचले ते नियतीने त्यांस अनाथ करून सोडले त्या अवस्थेत. ते छोटी-मोठी कामे करून शिकत असताना त्यांना ओढ होती वैदिक संस्कृत ज्ञानाची. पण कर्मठ वातावरणात त्या वेळेस अनाथ मुलाला ज्याचे गोत्र आणि जन्म माहीत नाही त्याला कोण शिकवणार? असे विचार त्यावेळी तमाम संस्कृत शिक्षक आणि वेदशास्त्र संपन्न मंडळींना वाटत होते. हिंदू समाजातील दोष कसे होते याचे हे एक विदारक दर्शन होते.कर्वे तात्या भावूक होऊन मला सांगत होते. अशा वेळेस तुझ्या आजोबांनी महादेव शास्त्री यांनी शिकवण्याचे मान्य केले. पण काही अटी घातल्या.
वेळ, शिस्त, शुद्ध वर्तवणूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुला मी जे ज्ञान देतो आहे ते तू अशा लोकांना दे की, जे या संस्कृत ज्ञानापासून वंचित आहेत. हे सांगताना त्या वेळी जवळ जवळ 80 वय असलेले कर्वे आजोबा आपल्या गुरु म्हणजे महादेवशास्त्री मुळे यांच्या आठवणीने भावनिक झाले. ते म्हणाले, “अरे, त्यांच्याच आशीर्वादाने आणि प्रेरणेने सध्या मी हे काम करतो आहे.” मी, डॉ. पुरकर परिवार आम्ही त्यांचा सगळा इतिहास ऐकत होतो. त्या वेळेसच्या परंपरा, रूढी या ज्ञानार्जन करण्यात कशा अडथळे ठरत होत्या, हे जाणवत होते.
मी तर माझ्या आजोबांना बघितलेच नव्हते, पण अत्यंत कर्मठ रागीट आणि शिस्त प्रिय ते होते, हे मला माहीत होते. आमच्या घरातील आध्यात्मिक परंपरा पण माहीत होती. पण जो सामाजिक दृष्टिकोन परंपरेने चालत आला होता, त्याला संघ हे माध्यम मिळणे हा योगायोग नव्हता आणि हे आपल्या पूर्वजांचे संचित आहे हे त्यादिवशी मला समजल्यावर माझा अहंकार गळून पडला. तात्यांना संस्कृत आणि वेद शिकवणे आणि पुन्हा हे ज्ञान वंचितांना दे असे सांगणारे माझे आजोबा यांची ही ओळख तात्या कर्वे यांच्यामुळे मला झाली होती.
पुढे फोन नंबर घेणे झाले. नगरला येण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि मग आपल्या पिशवीतून मिर्गुंड, पोह्याचे पापड, खारवलेल्या मिरच्या असा कोकण मेवा माझ्या हातात दिला आणि सूनबाई आणि नातीला दे असे आग्रहपूर्वक सांगितले. पुढे त्यांचे फोन यायचे. एकदा त्यांच्या सगळ्या विद्यार्थिनींना घेऊन ते घरी आले. निमित्त होते त्या विद्यार्थिनीकडील नातेवाईकांकडे नगरला धार्मिक कार्यक्रम होता. त्याचे पौरोहित्य या मुलींनी केले होते. तात्या कर्वे यांच्या दृष्टीने ते खेड्या पाड्यातील ‘गार्गी’सदृश विदुषीच घडवत होते. त्यांच्याबरोबरच्या आलेल्या त्यांच्या विद्यार्थिनींचे आणि त्यांचे असलेले आजोबा आणि नाती असे नाते मी बघत होतो.
मी ज्या वास्तूत शिकलो तेथे मला घेऊन चल असे ते म्हणाले. त्या वास्तूचे आता अपार्टमेंटमध्ये रुपांतर झाले होते. माझे व्यावसायिक कार्यालय तेथे होते. पण श्रद्धा आणि गुरुभक्ती काय असते याचे त्या दिवशी ते ज्या पद्धतीने तिथे वावरत होते, बघत होते त्यांचे डोळे तृप्त करून मनात सगळे साठवून घेत होते, यातून मला दर्शन होत होते. त्या वास्तूत राहणारे आणि माझ्या कार्यालयात काम करणारे यांना या वास्तूबद्दल आणि आपल्या गुरुवर्यांबद्दल किती सांगू आणि किती नाही असे त्यांना झाले होते. जणू पुन्हा ते त्या काळात गेले होते आणि वयोवृद्ध तात्या मला एकदम निरागस विद्यार्थी भासू लागले होते. भेटेल त्याला पिशवीतून कोकणातला काही ना काही कोकण मेवा इमारती मध्ये ते देत होते. मला तर इमारत बांधल्यानंतर पुन्हा एखादा वास्तू महोत्सव होतो आहे असे वाटत होते.
पुढे आम्ही सुरू केलेल्या संस्कृत अध्ययन केंद्राच्या बक्षीस सभारंभात ते आले होते. त्यांनी त्यावेळी अथर्वशीर्ष याचे निरूपण केले ते अजून लक्षात आहे. आमच्या मोरया सांस्कृतिक केंद्राची वास्तूचे उद्घाटनच त्यांच्या पवित्र कर-कमलानी झाले होते. मनीषा माझी पत्नी आमच्या घरातील संस्कृत शिकवण्याची खंडित परंपरा पुढे चालवत आहे, हे बघून सुनेबद्दल असणार्या आत्मीयतेने त्यांनी कौतुक केले होते. सुदैवाने तात्या कर्वे यांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे ते अध्यापन उत्तरोत्तर अधिक व्यापक आणि तात्या कर्वे आणि त्यांचे गुरू महादेव शास्त्री यांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे चालू आहे.
तात्या कर्वे यांच्यासारखी माणसे म्हणजे ज्यांना जीवनाचा अर्थ कळला अशी माणसे. गीतेतील कर्मयोग, स्थितप्रज्ञवृत्ती आणि ज्ञानयोगाचे तात्या म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. अतिशय मोठे कार्य करत असताना ही त्याचा गाजावाजा नाही. प्रसिद्धी नाही. कुणी दखल घ्यावी, ही अपेक्षा नाही. दखल घेतली नाही घेतली पुरस्कार मिळाले नाही मिळाले तरी मी एक विशिष्ट पद्धतीने जीवन जगायचे ठरवले आहे. त्यासाठी मी माझ्या गरजांचा संकोच करेल. पोशाख आणि बाकी कुठलेच अवडंबर करणार नाही. आर्थिक अपेक्षा करणार नाही. ज्ञान देताना ते निरहेतुक असावे ही वृत्ती.
तात्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले होते. तात्या संघाचे पण स्वयंसेवक होते. स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कधी कुठले दावे करून मोबदला मागितला नाही. कारण, ते खरेखुरे स्वयंसेवक होते. समाज परिवर्तनाचे काम शांत पणे ते करत राहिले. पूजनीय सुदर्शनजी यांनी केलेला सत्कार त्यांनी स्वीकारला, पण यात सत्कार करून घेण्यापेक्षा पूजनीय सुदर्शनजी यांची भेट हे त्यांना अप्रूप होते.
आज संस्कृत पुन्हा सातासमुद्र ओलांडून लोकप्रिय होत आहे. संगणकाला सर्वात योग्य, संस्कार देणारी भाषा अशी तीची ओळख होत आहे. हिब्रू भाषेला मृत होण्यापासून वाचवले गेले हे आपण ऐकतो. पण, संस्कृत भाषेला पुन्हा जेव्हा गत वैभव प्राप्त होईल तेव्हा अशा असंख्य तात्या कर्वे याच्या तपश्चर्येचे ते फळ असणार आहे, हे आपण विसरता नये. तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या निधनानंतर संस्कृत भाषेसाठी कार्य करण्याची प्रेरणा सर्वांस मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
- रवींद्र मुळे