मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत रोखल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे १०४ तर रविंद्र जडेजा ४० धावांवर खेळत आहे. संघ अडचणीत असताना, रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेच्या खेळीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियात शतक झळकवणारा पाचवा भारतीय कर्णधार
अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटीत शतक करत एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तो मोहम्मद अझरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली यांच्यानंतरचा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच अजिंक्यने मेलबर्न क्रिकेट मैदानावर झळकावलेले हे दुसरे शतक आहे. भारताकडून एमसीजीवर दोन शतक करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी विनू मांकड यांनी अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९८५ नंतर प्रथमच असे घडले आहे की भारतीय संघाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात आघाडी आघाडी घेतली. एडिलेड कसोटीत भारताने पहिल्या डावात ५३ धावांची तर दुसऱ्या कसोटीत आतापर्यंत ८२ धावांची आघाडी घेतली आहे.
विराट कोहलीनेही केले रहाणेचे कौतुक
विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने म्हंटले आहे की, "आपल्या भारतीय संघासाठी आणखी एक चांगला दिवस, कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट. नक्कीच अजिंक्य अशी टॉप फलंदाजी." विराट सध्या भारतात असला तरीही ट्विटरवरून वेळोवेळी त्याने भारतीय संघाचे कौतुक केले आहे.